हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेत नाही. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून सपकाळांनी फडणवीसांवर थेट आणि बोचऱ्या शब्दांत टीका केली.
फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सपकाळांनी ‘फसवणीस’ या शब्दाचा वापर केला. वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला.
Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्राची सुजाण जनता दुधखुळी नाही.” महाराष्ट्रात खोटे फॅक्ट्स पेरण्यात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात फडणवीस आणि दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा हात कोणीच धरू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राची सुजाण जनता दुधखुळी नाही! महाराष्ट्रात खोटे फॅक्ट्स पेरण्यात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात तुमचा आणि तुमच्या दिल्लीतील ‘राजा बाबू’चा हात कोणीच धरू शकत नाही. लहान मुलाला विचारलं तरी खोटेपणाच्या शर्यतीत पहिलं नाव तुमचंच येईल..!… pic.twitter.com/UuwdZwAFsC — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) September 4, 2026
वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण यांसारख्या मुद्द्यांचा दाखला देत सपकाळांनी फडणवीसांवर आरोप केले. “असंख्य मुद्द्यांवर तुमचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला ‘फसवणीस’ नाव दिले आहे,” असं सपकाळांनी म्हटलं.
याच पोस्टमध्ये सपकाळांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचाही उल्लेख केला. नोटबंदी, कोविड काळातील परिस्थिती, अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि महागाई या विषयांवर राहुल गांधी यांनी केलेले दावे आणि उपस्थित केलेले प्रश्न आज वास्तव म्हणून देशासमोर उभे असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे इतरांवर ‘फेक नरेटिव्ह’ पसरवल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचा टोला सपकाळांनी फडणवीसांना लगावला.
दरम्यान, सपकाळांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आगामी काळात भाजपकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






