'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
नारायणगाव : मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे. या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मुंबई गिळण्याचे काम मोदी, शहा, फडणवीस भविष्यात करतील अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओझर (तालुका जुन्नर) येथे केली. मुंबईसह महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस गट-तट विसरून दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला तर ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
शिवसेना जुन्नर तालुका पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यापूर्वी तसेच जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ते जुन्नर तालुक्यात आले होते. त्यावेळी ओझर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील का? या प्रश्नावर त्यांनी मराठी माणसाच्या भवितव्यासाठी एकत्र आले तर चांगलंच आहे, असे स्पष्टीकरण दिले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे जाहीर केल्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना-पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी दौरे चालू असल्याचे सांगताना लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही, ते अजित पवारांच्या चोरलेल्या पक्षात
छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी स्वीकारले आहे. भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात ते आहेत. भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने कितीही मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार, भाजप गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त म्हणजे चार मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात, असाही टोला त्यांनी लगावला.