महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाबद्दल राज ठाकरेंनी पोस्ट केली (फोटो - सोशल मीडिया)
Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale : मुंबई : मराठी सिनेविश्वामध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. नुकताच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी 2009 साली मांजेकरांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता नवीन चित्रपट देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पाहिला. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन चित्रपटाचा अभिप्राय लिहिला आहे. याचबरोबर महेश मांजरेकर यांचे कौतुक करत मराठी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबाबत लिहिले आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही…”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.” असे टीकास्त्र राज ठाकरेंनी डागले.
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला… समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही… पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे… pic.twitter.com/Xum0x5Gfxz — Raj Thackeray (@RajThackeray) November 2, 2025
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही… पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट जरूर पहा…” अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे कौतुक केले आहे.तसेच मराठी लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले.






