विधानसभा निवडणूकीमध्ये मनसे जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याची राज ठाकरेंची घोषणा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महायुतीला सरकारला कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे मोठ्या ताकदीने जोरात लढवत आहे. आम्ही जोषात आणि पूर्ण प्रयत्नाने निवडणूक लढवत आहोत. मी माझ्या सभेमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे पक्ष हा सत्तेमध्ये असणार आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढणार आहे. किती काय हे तुम्हाला समजेल. हे मी फक्त कार्यकर्त्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
पुढे त्यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना सांगितले की, मनसेचा जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. 2014 ला लढवल्या. 2009 लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कंगाल होणार आहे. हे असं पाच आणि सात हजार रुपये वाटून काही होणार नाही. पैसे हे त्यांच्या घरचे नाही तर सरकारचे आहेत. तिजोरीमध्ये पैसे नाहीत आणि हे वाटावाटी करत आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.