"घरी बसून चालणारे सरकार नको तर जनतेत मिसळणारे सरकार सत्तेवर आणा"; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
अहिल्यानगर / गिरीश रासकर : विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष आता राज्यभर प्रचारसभा घेत आहे. या प्रचारसभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी सगळ्याच नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता राहुरी विधानसभा मतदार संधात सभा घेत महायुतीचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला आहे.भेत रावसाहेब दानवे म्हणाले की, ” राज्यात 2019 मध्ये जनतेने भाजप-शिवसेना युतीला सत्ता दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली”. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 मध्ये सरकार आल्यावर विकासाला चालना मिळाली . या विकास प्रक्रियेला राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात खीळ बसली. आता मात्र भाजप महायुतीला बहुमताने विजयी करून शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा आमदार राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर पाठवा असे आवाहन भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आदींसह वांबोरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा खरा लाभ मोदी सरकार आल्यावर मिळू लागला. शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत दिली जाते. महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींना सन्मान केला आहे. भाजप जनहिताचे निर्णय घेत असताना महाविकास आघाडीकडून चांगल्या योजनांना खीळ बसवण्याचे काम होत आहे. आज दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे. राज्यातही त्याच विचारांचे सरकार नक्की येईल असा दावा दानवे यांनी केला.
हेही वाचा-“योजना फसवी आहे म्हणता मग तुम्हीच अधिकचे पैसे महिलांना का देता”?; विखे पाटलांचा विरोधकांना टोला
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारची तुलना केली तर महायुती सरकारच्या काळातील चांगले काम सहज दिसून येईल. आम्ही ‘लाडकी बहिण योजना’ सुरू केली तर महाविकास आघाडी योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली. त्यामुळे आता ते मत मागायला तुमच्या दारात आले तर बहिणींनी त्यांना उभे सुद्धा करू नये. त्यांच्या सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्री होते. एकालाही राहुरी तालुका किंवा जिल्ह्यात एखादी मोठी योजना आणता आली नाही. त्यामुळे यावेळी महायुतीच्या हातात स्पष्ट बहुमताची सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, ‘मी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह गर्दीतून दिसून येत आहे. वांबोरी येथे तर विक्रमी संख्येने मतदार आले आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित असून राहुरी तालुक्यातील मतमोजणीतच मी विजयी होईल. खरं तर मागील वेळी ज्यांना संधी मिळाली ते आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. माझ्या काळात मंजूर झालेल्या योजनांमध्ये आडकाठी आणली गेली. त्यामुळे राहुरी शहर व तालुक्यात विकासकामे झाली नाहीत’. ऊस उत्पादकांना योग्य भाव दिला नाही, शेजारच्या प्रवरा कारखान्याने 3200 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची खरी काळजी कोण घेतो हे दाखवून दिले. आतापर्यंत जी काही विकासकामं झाली ती कोणत्या सरकरच्या काळात झाली हे जनतेचा चांगलच माहित आहे. त्यामुळे कोणत्या सकराला निवडून आणावं हे सर्वस्वी जनतेच्या हातात आहे. असं वक्तव्य शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आहे.