
'ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात'; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अहिर यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला.
उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे दाखवून दिलं.”
उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना सहज भेटत नाहीत, या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, “माझा तसा काही अनुभव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत, हेच त्यांचं सर्वात मोठं आकर्षण आहे. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा, तेही हेच सांगतील. असा नेता आपल्यासोबत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते.”
यावेळी त्यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं, “थोडा संयम ठेवायला हवा. पण ज्यांनी आयुष्यात कधी दगडही उचलला नाही, ते आज आम्हाला शिकवायला लागले आहेत.”
एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना अहिर म्हणाले, “कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर पोहोचू शकतो, हे दाखवून दिले.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसासाठी काम केले. आता त्यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळातूनही लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे.”
Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?
उपसभापतीपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना सचिन अहिर यांनी सांगितले की, “रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी निर्माण केलेली परंपरा आणि त्या पदाची गरिमा कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले, “ज्या भागात पक्षाची संघटनात्मक ताकद कमी आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहे. ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.”
अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांनीही पक्षांतर केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.