कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! माविआ उमेदवार बाळ माने यांनी घेतला अर्ज मागे
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार, ४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता मोठी बातमी येत असून रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात १७ विधान परिषद मतदारसंघांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. आधी जागावाटपावरून आणि आता उमेदवारीवरून जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही राजकीय घडामोडीना वेग आला आहे. कोकण मतदारसंघातले ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासह रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज माघारी घेतला. बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकणातील निवडणूक बिनविरोध होणार आहे.
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत हि माहिती दिली आहे. ते म्हणाले, “बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे!”
बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे! — Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या वतीने मी शिवसेना ठाकरे गटाकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या छानणीत सहाच्या सहा उमेदवार वैध ठरले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीत १०१८ मतदार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आमचे २०० च्या आसपास संख्याबळ आहे. लोकशाहीत निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध निवडणुका होऊ नयेत या मताचाच मी होतो. परंतु, गेल्या चार-पाच दिवसात मी मतदारांच्या भेटीच्या निमित्ताने काही जणांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मी फॉर्म भरताना सुद्धा चार फॉर्म भरले होते. एका फॉर्मला १० सूचक लागतात. ठाकरे गटाचे ५५ नगरसेवक या मतदारसंघात होते. मला ४० सह्या मिळाल्या. महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या मिळाव्यात अशी विनंती केली होती. मी अनेक वेळा विनंत्या करूनदेखील मला सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे, माझया मनात शंकेची पाल चुकचुकली. आज मी पाहिलं कि घोडेबाजार सुरु झालेला होता, असं माझ्या कानावर आलं. घोडेबाजार करून निवडणूक लढावं हे काही कोकणच्या संस्कृतीला हिताचे नाही. त्यामुळे मी विचार करून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’






