
Varsha Gaikwad, Maharashtra Government, disqualification of beneficiaries in Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana,
देशभरात राजकीय घडामोडीना आता वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाटिपण्या, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. राजधानी दिल्लीत आज पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत चांगलीच आगपाखड केली आहे. देशाचे नेते राहुल गांधींवर टीका करण्याची तुमची पात्रता नसल्याचे बोलत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
आज (सोमवार, ८ जून) दिल्लीत इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. संपूर्ण देशभराचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत हजार राहू शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. आता यावरून इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. यावरून वर्षा गायकवाड यांनी आपल्या X अकाऊंटवरून एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “एकनाथ शिंदेजी, देशाचे नेते, जननायक राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून सत्ता मिळवणारे तुम्ही जनसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राहुलजींवर टीका करता? हा तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार आहे. सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, विचार आणि जनतेने दिलेला विश्वास पायदळी तुडवणाऱ्यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे.”
एकनाथ शिंदेजी, देशाचे नेते, जननायक राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून सत्ता मिळवणारे तुम्ही जनसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राहुलजींवर टीका करता? हा तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार आहे. सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, विचार आणि जनतेने… pic.twitter.com/snWJyezCPe — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 8, 2026
“तुमच्या स्वतःच्या पक्षात असंतोष धुमसत आहे. भाजप स्लो पॉयझनसारखं तुमच्या पक्षाला कमकुवत करतंय, असं तुमचेच आमदार म्हणताहेत. अशा वेळी स्वतःच्या घराला लागलेली आग विझवण्याऐवजी दुसऱ्यांच्या घरात डोकावणं बंद करा! इंडिया आघाडी एकजुटीने व मजबुतीने जनतेचे प्रश्न मांडत आहे. शेवटी एवढंच सांगेन, दिल्लीसमोर नतमस्तक होऊन मिळवलेली खुर्ची आणि जनतेच्या विश्वासातून मिळवलेले नेतृत्व यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो, हे लक्षात ठेवा,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत एकनाथ शिंदेनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, “देशभर बैठका घेतल्या जात असल्या तरी त्यामागे ठोस दिशा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करतील, कारण त्यांना १४० कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि विश्वास लाभला आहे. राहुल गांधींनी आधी स्वतः सातत्याने देशात राहून काम करून दाखवावे, त्यानंतरच मोदींवर टीका करावी,” असा टोला त्यांनी लगावला. ज्येष्ठ नेते शरद पवार, ममता बॅनर्जी या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “देशात असताना आणि देशाबाहेर गेल्यानंतरही पंतप्रधानांची बदनामी करण्याचे राजकारण सुरू आहे. ही कसली देशभक्ती आहे,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.