'इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची, एकनाथ शिंदेंचा घणाघात;
आज (सोमवार, ८ जून) दिल्लीत इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. संपूर्ण देशभराचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत हजार राहू शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. आता यावरून इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विरोधकांचे मनोबल पूर्णपणे खच्ची झाले असून इंडिया आघाडी गलितगात्र अवस्थेत पोहोचली आहे,” असा घणाघाती आरोप करत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचे राजकारण सुरू असल्याचा दावा करत शिंदे यांनी आगामी काळात मोदींचे नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दिल्लीमध्ये देशातील २० राज्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “विरोधी पक्षांना देशाची प्रगती सहन होत नसल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने पुढे जात आहे. मात्र विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने ते सातत्याने मोदींवर टीका करण्याचे काम करत आहेत. देशाची प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा त्यांच्या पचनी पडत नाही,” असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, “देशभर बैठका घेतल्या जात असल्या तरी त्यामागे ठोस दिशा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करतील, कारण त्यांना १४० कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि विश्वास लाभला आहे. राहुल गांधींनी आधी स्वतः सातत्याने देशात राहून काम करून दाखवावे, त्यानंतरच मोदींवर टीका करावी,” असा टोला त्यांनी लगावला.
ज्येष्ठ नेते शरद पवार ममता बॅनर्जी या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “देशात असताना आणि देशाबाहेर गेल्यानंतरही पंतप्रधानांची बदनामी करण्याचे राजकारण सुरू आहे. ही कसली देशभक्ती आहे,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“इंडिया आघाडीच्या बैठकीपासून काही महत्त्वाचे नेते दूर राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पूर्वी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणारे नेतेच आता या बैठकापासून दूर राहत आहेत ते फेसबुक लाईव्ह पुरते येतात,” असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पराभवाची भीती आणि आघाडीतील अंतर्गत मतभेद यामुळे अनेक नेते अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस छोट्या पक्षांना संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप करताना शिंदे म्हणाले की, महायुतीचे गठबंधन हे विचारधारेवर आधारित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले आहेत. याउलट काही पक्ष केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले.
२०१४ पूर्वी देशात स्पेक्ट्रम, कोळसा, टू-जी आणि चारा घोटाळ्यासारखे अनेक भ्रष्टाचार झाले. मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मोदींवर टीका करणाऱ्यांचे आरोप जनतेकडून फेटाळले जातील, असेही ते म्हणाले. विरोधकांवर आणखी हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले की, देशभक्तीची भाषा करण्याऐवजी काही विरोधक देशाच्या हिताविरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची विश्वासार्हता कमी होत चालली आहे.






