विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीरपणे कौतुक करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापुरात आयोजित तेली समाजाच्या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले.
बावनकुळे यांच्या निर्णयक्षमतेचा आणि कामाच्या वेगाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विधानसभेतही त्यांच्या कामाचे अभिनंदन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करायला सुद्धा आपण पाहिजे’, असेही म्हटले.
सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या भूमिकेत असले तरी समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. बावनकुळे यांनी सरकारमध्ये समाजाच्या मागण्या मांडाव्यात, तर आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेतून हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करू, असे त्यांनी सांगितले.
तेली समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज असून संताजी महाराजांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार यांनी यापूर्वी समाजासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा उल्लेख करत आता त्यात आणखी वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘मागणारे आम्ही आहोत, देणारे तुम्ही आहात,’ असे म्हणत त्यांनी बावनकुळेंकडून समाजाच्या विकासासाठी पुढाकाराची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, तेली समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खाद्यतेल विक्रीशी संबंधित बदलांमुळे पारंपरिक छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याचे सांगत गरीब ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
समाजाच्या प्रश्नांसाठी आठवड्यातून किमान दोन तास देण्याचे आवाहन बावनकुळे यांना करत वडेट्टीवार यांनी सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका मांडली.






