नागराबाई देविदास साठे यांना 'नवभारत नवराष्ट्र'चा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार
पंढरपूर : आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाच्या कारकीर्दीत विकासकामाच्या जोरावर लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीस आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवून देणाऱ्या लक्ष्मीटाकळीच्या ग्रामपंचायत सदस्य नागरबाई देविदास साठे यांना दैनिक नवभारत नवराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नागरबाई साठे यांनी ग्रामपंचायत लक्ष्मीटाकळी (ता.पंढरपूर) या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२ ते २०२५ पर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुणे येथे शनिवारी (दि.२६) दैनिक नवभारत नवराष्ट्र पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण सुनंदा पवार व सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरबाई साठे यांच्यासह त्यांचे पती देविदास साठे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे यांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रकाश झोतात आली होती. अगदी कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या भरीव अशा कामामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात प्रसिद्धी मिळवली होती. यासोबतच सातत्याने पाठपुरावा करत ग्रामपंचायतीसाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे, यासारखी अनेक कामे त्यांनी आपल्या कालावधीत मंजूर करून आणली.
यासोबतच संपूर्ण गावांमध्ये धुम्रपानजन्य पदार्थास विक्रीस बंदी यांसारख्या अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.