या दिवशीच 'गेटवे ऑफ इंडिया' मुंबईचे ऐतिहासिक आणि भव्य प्रतीक सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मुंबई : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला पाहिल्याशिवाय मुंबईची सफर अपूर्ण वाटते. या ऐतिहासिक वास्तूने 4 डिसेंबर 2024 रोजी आपले शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे. भारतीय इतिहासातील एका महत्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या स्मारकाचा इतिहास समजणे आणि त्याचा अनुभव घेणे ही एक आगळीवेगळी अनुभूती आहे.
गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास
गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक 20 व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आले. ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांची भारतातील पहिली भेट 1911 मध्ये होती. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या अपोलो बंदरावर या भव्य स्मारकाची रचना करण्यात आली. 31 मार्च 1911 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज सिनेहॅम यांनी या स्मारकाची पायाभरणी केली. तथापि, बांधकामाच्या विलंबामुळे सम्राट आणि सम्राज्ञी यांच्या स्वागतासाठी तात्पुरते कार्डबोर्डचे गेट उभारण्यात आले. 2 डिसेंबर 1911 रोजी या तात्पुरत्या रचनेखाली सम्राट आणि राणीचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष स्मारकाचे काम पूर्ण होण्यास तब्बल 13 वर्षे लागली. अखेर, 4 डिसेंबर 1924 रोजी गेटवे ऑफ इंडिया सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.
वास्तूची रचना आणि बांधकाम
गेटवे ऑफ इंडियाची रचना इंडो-सारासेनिक शैलीत करण्यात आली असून ती सुप्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी डिझाइन केली. स्मारकाच्या बांधकामासाठी पिवळा बेसाल्ट आणि काँक्रीटचा वापर करण्यात आला, तर त्याच्या घुमटासाठी सुंदर जाळी ग्वाल्हेरहून आणण्यात आली. या स्मारकावर सुमारे 21 लाख रुपये खर्च करण्यात आले होते, जे त्या काळातील खूप मोठी रक्कम होती. स्मारकाचे मुख्य घुमट 15 मीटर रुंद आहे. याच्या दोन्ही बाजूंना कोरलेल्या माहितीफलकांवर स्मारकाच्या बांधकामाचा इतिहास नोंदवलेला आहे. ब्रिटिश अधिकारी भारतात आले की त्यांचे स्वागत या प्रवेशद्वाराने केले जात असे, म्हणूनच याला ‘गेटवे ऑफ इंडिया’ असे नाव दिले गेले.

Gateway of India history ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जाणून घ्या भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि चीनच्या नौदलाची किती आहे ताकद?
आधुनिक काळातील महत्त्व
गेटवे ऑफ इंडिया केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर मुंबई शहराचे एक प्रतीक बनले आहे. यामुळे केवळ ब्रिटिश काळातील राजवटीच्या प्रभावाची ओळख होत नाही, तर भारतीय स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक टप्प्यांचीही आठवण करून दिली जाते. असे मानले जाते की गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांवरूनच शेवटच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1948 साली भारत सोडला होता.
आजचे गेटवे ऑफ इंडिया
गेटवे ऑफ इंडिया हे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. या स्मारकाच्या समोरचा विस्तीर्ण समुद्र, बाजूलाच उभे असलेले ऐतिहासिक ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि हवेत घिरट्या घालणारी कबुतरे यामुळे या ठिकाणी एक आगळा माहोल तयार होतो. येथे येणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाची अनुभूती आणि मुंबईच्या आधुनिकतेचा गर्व एकाच वेळी अनुभवायला मिळतो.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Cheetah Day, आजपासून ‘वायू’ आणि ‘अग्नी’ला कुनोच्या जंगलात करता येणार मुक्त संचार
संपूर्ण अनुभव
गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा इतिहास, कला आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाप. येथे प्रवेश विनामूल्य असल्यामुळे प्रत्येकजण या ठिकाणी येऊन या भव्य वास्तूचा अनुभव घेऊ शकतो. समुद्राच्या लाटा आणि ऐतिहासिक वास्तू यांचा नजारा पाहताना पर्यटक हे स्मारक केवळ डोळ्यांनीच नव्हे, तर मनानेही अनुभवतात. मुंबईतील कोणत्याही प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनलेले गेटवे ऑफ इंडिया हे केवळ एक स्मारक नाही, तर भारताच्या गौरवशाली इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे.






