रोहित शर्माने वजन कमी केले(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma has lost weight : आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम सामन्यात देखील पोहचला आहे. अशातच आता एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा चर्चेत आला आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्यासाठी रोहित शर्मा घाम गाळत आहे. दरम्यान रोहित शर्माने आपल्या फिटनेसमध्ये मोठा बदल केला आहे. सरावादरम्यान त्याने जवळजवळ १० किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे.
रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि भारताचा माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायरकडून मुंबईत रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रोहित शर्माचे वजन कमी झालेले दिसत आहे. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
अभिषेक नायरने रोहित शर्माबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले, “१०,००० ग्रॅम किंवा १० किलो वजन कमी केल्यानंतर देखील आम्ही कठोर मेहनत करत राहतो.” ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि चाहते आणि सहकारी खेळाडू त्याच्या फिटनेसचे कौतुक करताना दिसत आहेत.
हेही वाचा : तस्किन अहमदने रचला इतिहास! बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या पुनरागमनासाठी जिममध्ये मेहनत करताना दिसत आहे. तो त्याचा मित्र अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे आणि आता रोहित शर्माला एक नवीन लूक देखील मिळाला आहे.
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मार्चमध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने आपल्या दमदार कामगिरीने सामनावीराचा पुरस्कार देखील जिंकला होता, तसेच त्याने आपल्या नेतृत्वाने संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून दिले.
रोहित शर्माची सप्टेंबरच्या सुरुवातीला बेंगळुरू येथील बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (सीओई) येथे फिटनेस चाचणी घेण्यात आली. तो यो-यो चाचणी आणि डीएक्सए स्कॅन चाचणी पास झाला.
हेही वाचा : IND vs SL Asia Cup 2025 : संजू सॅमसनसह हे 3 खेळाडू आज बाहेर राहणार…अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11
बीसीसीआयकडून भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारत अ संघाकडून खेळतील, परंतु दोघांनाही संघात स्थान दिले गेले नाही.