Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! ५०० दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
बांगलादेशातील राजकीय पेचप्रसंग (Bangladesh ICT Verdict) आणि हिंसाचाराची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (International Crimes Tribunal – ICT) माजी पंतप्रधान शेख हसीना (sheikh hasina) यांच्या अत्यंत जवळच्या सात वरिष्ठ नेत्यांना मृत्युदंडाची (फाशीची) कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. या निकालावर तीव्र आक्षेप घेत अवामी लीग पक्षाने हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी, पक्षपाती आणि राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी घेतलेला ‘बनावट निर्णय’ असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधिकरणाने मंगळवारी शेख हसीना यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि अवामी लीगचे सरचिटणीस ओबैदुल कादर यांच्यासह पक्षाच्या आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या इतर सहा वरिष्ठ नेत्यांना दोषी ठरवले. जुलै २०२४ मध्ये झालेल्या मोठ्या जनउठावा दरम्यान घडलेल्या ‘मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’ ही फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, अवामी लीगने यावर पलटवार करत आरोप केला आहे की, सध्याचे अंतरिम सरकार न्यायव्यवस्थेचा वापर विरोधकांविरुद्ध शस्त्र म्हणून करत असून हा ‘न्यायिक हत्येचा’ (Judicial Murder) प्रकार आहे.
न्यायाधिकरणाच्या या निर्णयावर कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित करताना अवामी लीग पक्षाने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. ज्या नेत्यांच्या विरोधात हा फाशीचा निकाल देण्यात आला, त्यांपैकी एकही नेता सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणासमोर हजर नव्हता, या मुख्य मुद्द्यावर पक्षाने बोट ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी कायद्याच्या मूलभूत नियमांनुसार, आरोपी अनुपस्थित असला तरी त्याला कायदेशीर संरक्षणाची हमी दिली गेली पाहिजे. यामध्ये आरोपीला आपल्या पसंतीचा वकील निवडण्याचा मूलभूत अधिकार समाविष्ट असतो. परंतु, या खटल्यात या सर्व जागतिक नियमांना धाब्यावर बसवून घाईघाईने निर्णय लादण्यात आला, असा थेट आरोप अवामी लीगने केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
पक्षाच्या मते, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी कायद्याची सर्व स्वीकारलेली तत्त्वे डावलून हा खटला पूर्णपणे बेकायदेशीर मार्गाने चालवण्यात आला. यामुळे देशात कायद्याचे राज्य स्थापन होण्याऐवजी राजकीय सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना अधिक खतपाणी मिळत आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आयसीटीने (ICT) केलेल्या सर्व कारवाया या आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
अवामी लीगने बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, अलोकतांत्रिक पद्धतीने सत्तेवर आलेल्या या सरकारने संविधान आणि कायदेशीर प्रक्रियेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. एका अध्यादेशाद्वारे ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण कायदा १९३७’ मध्ये मनमानी दुरुस्ती करण्यात आली, जेणेकरून अवामी लीगच्या नेत्यांवर कायदेशीर चौकटीत सूड उगवता येईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे पूर्वनियोजित राजकीय कारस्थान आहे.
पक्षाने पुढे असाही आरोप केला की, राजकीय वचपा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या अभियोजन आणि न्यायिक समित्यांमध्ये जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या कट्टर कार्यकर्त्यांचा भरणा करण्यात आला होता. या समित्यांनी पूर्णपणे खोट्या आणि बनावट पुराव्यांच्या आधारे अवामी लीगच्या नेत्यांवर आणि हजारो कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे खटले दाखल केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
शिक्षेच्या या निकालामुळे बांगलादेशात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराची मालिका अधिक भीषण रूप धारण करेल, अशी तीव्र चिंता अवामी लीगने व्यक्त केली आहे. या राजकीय संघर्षात आधीच शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला असून, सध्याच्या निर्णयामुळे मनमानी अटकांचे सत्र वाढेल आणि हजारो कार्यकर्त्यांचे आयुष्य तुरुंगात बरबाद होईल. जुलै-ऑगस्ट २०२४ च्या हिंसाचाराचा आधार घेऊन सरकार पोलिसांच्या कोठडीत अत्याचार करत असल्याचा आणि बनावट चकमकी घडवत असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
याशिवाय, अवामी लीगने एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला अवामी लीगच्या नेत्यांना फाशी दिली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला देशातील शेकडो धोकादायक आणि दोषी ठरलेल्या इस्लामी अतिरेक्यांना जामिनावर मुक्त केले जात आहे. अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या व्यक्तींना मोकळे सोडल्यामुळे बांगलादेश आता जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक बनत चालला आहे, असा इशारा अवामी लीगने दिला आहे.






