'पुरे झाले, आता नाही....' भारतीय खासदारांनी मॉस्कोमध्ये पाकिस्तानचे वाभाडे काढले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Pakistan conflict 2025 : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारताने ‘शून्य सहनशीलता’ या धोरणाच्या आधारावर जगभरात मोठे मुत्सद्दी अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत, भारतीय संसदेमधील सर्वपक्षीय सात शिष्टमंडळे जगातील ३३ प्रमुख राजधान्यांमध्ये पोहोचत आहेत. त्यांचे उद्दिष्ट एकच पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करणे आणि भारताच्या कठोर भूमिकेची जागतिक पातळीवर प्रभावी मांडणी करणे.
मॉस्कोमध्ये पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाने रशियाला पाकिस्तानच्या दहशतवादी संबंधांबद्दल ठोस पुरावे सादर केले. काँग्रेस नेते राजीव राय यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “रशिया आमचा ऐतिहासिक आणि विश्वासू मित्र आहे. आज पाकिस्तान केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोका बनला आहे.” कनिमोझी यांनी रशियाला भारताचा धोरणात्मक भागीदार म्हणून संबोधले. शिष्टमंडळाने रशियन स्टेट ड्यूमा कमिटीचे अध्यक्ष लिओनिड स्लुत्स्की, उपपरराष्ट्र मंत्री आणि विविध थिंक टँक यांच्याशी संवाद साधून, भारताची भूमिका स्पष्ट केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा
यूएईमध्ये शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतीय समुदायासमोर ठामपणे सांगितले की, “हा नवा भारत आहे. जो कोणत्याही दहशतवादी कृत्याचा प्रत्युत्तर देईल आणि शांत बसणार नाही.” भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी युएईच्या सहकार्याचे कौतुक करताना स्पष्ट केले की, “२२ एप्रिल रोजी भारतावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तानने शांतता सोडून युद्धाचा मार्ग निवडला.”
JD(U) खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जपानमध्ये पोहोचले आहे. यात सलमान खुर्शीद, अभिषेक बॅनर्जी, अपराजिता सारंगी, ब्रजलाल यांसारखे विविध पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होते. टोकियोत झालेल्या बैठकीत सलमान खुर्शीद यांनी सांगितले, “दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात जगाचा पाठिंबा मिळत आहे. हे समर्थन केवळ आजपुरते न राहता, दीर्घकालीन असावे हे महत्त्वाचे आहे.”
भारताच्या या धोरणात्मक हालचालींचे मूळ आहे अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाचे प्रातिनिधिक उदाहरण ठरली आहे. आता हे धोरण केवळ देशांतर्गत मर्यादित न राहता, जगभर मांडले जात आहे.
रशिया, युएई, जपानबरोबरच भारताचे हे शिष्टमंडळ स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया, स्पेन यांसारख्या देशांनाही भेट देणार आहे. हे केवळ राजनैतिक दौरे नाहीत, तर दहशतवादाविरुद्ध जागतिक आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले, “पाकिस्तानसोबत भविष्यातील संबंध त्यांच्या वर्तनावर अवलंबून असतील. भारत आता कोणत्याही दहशतवादी सहिष्णुतेस स्थान देणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मॉस्को विमानतळावर युक्रेनी ड्रोन हल्ला; भारतीय खासदारांचे विमान हवेतच अडकले
भारताची ही नव्या स्वरूपातील मुत्सद्देगिरी आणि आक्रमक भूमिका, पाकिस्तानसारख्या देशांसाठी कठोर संदेश आहे. आता जगाला भारत सांगत आहे – “पुरे झाले, आता नाही!” आणि हे शब्द फक्त घोषवाक्य नाहीत, तर एका बदललेल्या, जागरूक आणि मजबूत भारताची भूमिका आहेत.