Pakistan Fuel Crisis: १५ ऑगस्टपासून पाकिस्तानात पेट्रोल पंप ठप्प होणार? डीलर्सचा सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
शेजारील देश पाकिस्तानात इंधनाचा एक मोठा नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (PPDA) आपल्या विविध मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेत सरकारला ७२ तासांचा थेट अल्टिमेटम जारी केला आहे. जर या कालावधीत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १५ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी ६ वाजेपासून संपूर्ण पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डीलर्स संघटनेने दिला आहे. या घोषणेमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, देशभरात वाहतूक आणि इंधन पुरवठा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कराची येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पीपीडीएचे (PPDA) अध्यक्ष मलिक खुदा बख्श यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह ही मोठी घोषणा केली. देशभरातील सर्व डीलर्सच्या बैठकीनंतर हा एकमुखाने निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या मते, सध्या पाकिस्तानातील १४,००० हून अधिक पेट्रोल पंप मालक सरकारच्या धोरणांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसाय चालवणे आता त्यांच्यासाठी अशक्य झाले असून, सर्व सदस्यांकडून त्वरित आणि ठोस कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळेच जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत एकही पेट्रोल पंप सुरू केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
यापूर्वी जुलै महिन्यातही पेट्रोल पंप डीलर्सनी अशाच प्रकारे देशव्यापी संप पुकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ७ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक आणि पीपीडीए प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चे दरम्यान, सरकारने दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्व समस्यांवर तातडीने आढावा घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून डीलर्सनी संप पुढे ढकलला होता. मात्र, सरकारला दिलेली मुदत संपूनही कोणतीही ठोस उकल न निघाल्याने डीलर्सनी पुन्हा एकदा आक्रमक पाऊल उचलत सरकारला अंतिम इशारा दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imran Khan Health : सर्वात मोठी बातमी! माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू; जाणून घ्या कुणी केला ‘हा’ मोठा दावा
डीलर्स संघटनेची मुख्य मागणी म्हणजे पेट्रोलच्या किरकोळ विक्रीवर मिळणारा त्यांचा नफा (मार्जिन) वाढवून तो ८ टक्के करण्यात यावा. देशात वेगाने वाढणारी महागाई, वीज आणि गॅसच्या दरांमधील अफाट वाढ, कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार आणि पंपांच्या दैनंदिन देखभालीचा खर्च यांमुळे सध्या मिळणारे कमिशन अत्यंत अपुरे पडत असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. सध्याच्या नफ्यामध्ये व्यवसाय पुढे चालवणे आणि कर्मचाऱ्यांचे पगार देणे अशक्य झाले असून, पेट्रोल पंप चालकांचे खेळते भांडवल (Working Capital) झपाट्याने संपत चालले आहे.
पेट्रोलियम डीलर्सच्या असंतोषाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान सरकारने लागू केलेली इंधनाची ‘दैनिक किंमत प्रणाली’ (Daily Price Mechanism) हे आहे. या प्रणालीनुसार इंधनाचे दर दररोज बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा स्थानिक पातळीवर दर अचानक कमी झाल्यास, डीलर्सकडे आधीच महागड्या दराने घेतलेला जो जुना साठा (Inventory) पडून असतो, त्यावर त्यांना थेट मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या पेट्रोल पंप चालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांचा व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यामुळे दैनिक किंमत धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा किंवा ही पद्धत रद्द करावी, अशी मागणी पीपीडीएने केली आहे.
याशिवाय, पीपीडीएने तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) वाटप धोरणावरही (Company Allocation Policy) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संघटनेच्या कार्यकारी समितीने हे धोरण अत्यंत भेदभावपूर्ण आणि सामान्य डीलर्सच्या व्यावसायिक हिताच्या विरोधात असल्याचे म्हंटले आहे. काही विशिष्ट घटकांना फायदा पोहोचवण्यासाठी हे नियम बनवण्यात आले असून यात पारदर्शकता आणि न्याय्यता आणण्याची गरज असल्याचे डीलर्सनी स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : D.Y. Chandrachud: युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने भारताचा दिग्गज कायदेपंडित मैदानात; डी. वाय. चंद्रचूडांवर मोठी ‘ही’ जबाबदारी
सरकारसमोर आता पुढील ७२ तासांच्या आत डीलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. जर या वेळेत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार झाला नाही, तर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता संपूर्ण पाकिस्तानात १४,००० हून अधिक पेट्रोल पंपांचे कुलूप उघडले जाणार नाही. १५ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असल्यामुळे या दिवशी होणाऱ्या संभाव्य संपामुळे देशातील दळणवळण, मालवाहतूक आणि दैनंदिन व्यावसायिक उलाढाल पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता पाकिस्तान सरकार या संकटातून मार्ग कसा काढते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





