नवी दिल्ली येथे आयोजित भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांच्या हस्ते मारुती सुझुकीच्या हरियाणातील खरखोडा येथील चौथ्या वाहन निर्मिती प्रकल्पाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी सुझुकी मोटर्सचे प्रमुख तोशिहिरो सुझुकी यांनी या प्लांटचा विस्तार जगातील सर्वात मोठ्या कार निर्मिती प्रकल्पांमध्ये करण्याचा संकल्प जाहीर केला.
सुझुकीच्या जागतिक उत्पादनात भारताचा मोठा वाटा
प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सुझुकीच्या जागतिक उत्पादनापैकी तब्बल दोन-तृतीयांश कार भारतात तयार होत असून, येथून त्या जगातील १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केल्या जात आहेत. केवळ कारच नव्हे, तर कावासाकी, यामाहा आणि होंडा यांसारख्या प्रसिद्ध जपानी ब्रँडच्या दुचाकी देखील भारतातून जगभर निर्यात केल्या जातात.
पंतप्रधानांनी भारत आणि जपानच्या भागीदारीचे कौतुक करताना सांगितले
“जेव्हा जपानचे तंत्रज्ञान व गुंतवणूक आणि भारताचा वेग (स्पीड) व प्रमाण (स्केल) एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा फायदा होतो. मग ते एअर कंडिशनर असो, पॉवर ग्रिड उपकरणे असो की वैद्यकीय तंत्रज्ञान.”
सध्या जगभरात पुरवठा साखळीतील अडथळे आणि व्यापारातील अनिश्चितता असतानाही, भारत आणि जपानने आपले आर्थिक संबंध अधिक मजबूत केले आहेत. “जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हाच खंबीर लोक अधिक मजबुतीने उभे राहतात,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच, मुक्त आणि नियमांवर आधारित भारत-प्रशांत महासागर क्षेत्र ही दोन्ही देशांची सामायिक प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या
३५,००० कोटींची गुंतवणूक आणि भव्य विस्तार
सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी सांगितले की, खरखोडा प्लांटची क्षमता वार्षिक ५ लाख युनिट्सवरून थेट १० लाख युनिट्सपर्यंत वाढवली जाईल, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या कार निर्मिती कारखान्यांपैकी एक बनेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ आणि भारत-जपान मैत्रीच्या यशाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदींच्या अनुकूल धोरणांमुळे सुझुकी कंपनी भारतात गुंतवणूक, रोजगार, निर्यात आणि तंत्रज्ञानाचा वेग वाढवत असून, ‘विकसित भारत’च्या प्रवासात आपले योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची पार्श्वभूमी
ऑगस्ट २०२२ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये वार्षिक २.५ लाख युनिट्सच्या सुरुवातीच्या क्षमतेसह हा प्लांट कार्यान्वित झाला होता आणि आता जुलै २०२६ मध्ये त्याच्या चौथ्या टप्प्याचे अधिकृत उद्घाटन करून विस्ताराची मोठी घोषणा करण्यात आली आहे.






