ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एक क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार
नाशिक शहरातील ४० सिग्नल्सवर बेशिस्त वाहन चालवणाऱ्या चालकांवर यापुढे पोलीस कंट्रोल रूममधून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंट्रोल रूममध्ये नियुक्त असलेले कर्मचारी लक्ष ठेवून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतील. शहरातील सिग्नल्सवर सर्रास लेन कटींग, सिग्नल जम्पींग तसेच इतरांचा जीव धोक्यात येईल अशा प्रकारे वाहन चालवण्याचे प्रकार घडतात. स्मार्ट सिटीने शहरातील पन्नासपेक्षा अधिक सिग्नलवर सीसीटीव्ही कार्यरत केले आहेत. या सीसीटीव्ही फुटेज पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूम पर्यंत पोहचते. मात्र, यापूर्वी वाहनचालकांवर ऑनलाईन कारवाई करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती.
याबाबत बोलताना वाहतूक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी सांगितले की, आमच्याकडे फुटेज उपलब्ध होतात. फुटेजमध्ये सिग्नल जम्पींगसह वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडी तसेच जीवघेण्या अपघातांचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर समोर येणाऱ्या व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून थेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा फोटो कसा घ्यावा. तो अपलोड करून संबंधित वाहनचालकांच्या मोबाईल क्रमांकावर दंड कसे पाठवात, याबाबत कर्मचारी प्रशिक्षित केले जातील.
पुढील आठवड्यापर्यंत प्रशिक्षण पूर्ण होईल. यानंतर वाहतूक शाखेमार्फत थेट ऑनलाईन दंड करण्यास सुरूवात होईल. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलिस २४ तास उपलब्ध असणे शक्य नाही. कर्मचारी नसताना वाहनचालक आपल्यासह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा वापर झाल्यास सिग्नल जम्पींग सारख्या घटनांना आळा बसू शकेल, असे एसीपी शिंदे यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित शहरात रस्त्यांसह पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येतो आहे. बेशिस्त वाहन चालकामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन दंड पाठवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखा सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिली.
वाहतूक नियमांनुसार, जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नाही किंवा हेल्मेट घातले पण त्याची स्ट्रिप लॉक केलेली नसेल तर तुम्हाला २००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आला आहे. अनेकदा असे घडते की दुचाकी चालकाने घातलेले हेल्मेटची स्ट्रिप लावलेली नसते. अशा स्थितीत हेल्मेट अपघाताच्या वेळी डोक्यातून निघून बाजूला पडू शकतं आणि दुचाकीचालकाचा अपघातात जीव जाऊ शकतो किंवा त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते.






