फोटो सौजन्य: Istock
Tata Motors ने उत्तर प्रदेशातील लखनौ प्लांटमध्ये १० लाख व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या निमित्ताने कंपनीने आपल्या ३५ वर्षांच्या औद्योगिक प्रवासाचा आणि राज्याच्या आर्थिक व कौशल्य विकासातील योगदानाचा गौरव केला. विशेष म्हणजे, या टप्प्यात तयार झालेले १० लक्षवे वाहन हे शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बस असून, पर्यावरणपूरक गतीशीलतेकडे टाटा मोटर्सच्या वाटचालीचे ते प्रतीक आहे.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath, टाटा सन्सचे अध्यक्ष Natarajan Chandrasekaran, तसेच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि टाटा मोटर्सचे एमडी व सीईओ गिरीश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते १० लक्षव्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत स्वस्त आणि फीचर्स जबरदस्त
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “लखनौ प्लांटमधील १० लाख वाहनांचे उत्पादन हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील औद्योगिक क्षमता आणि कुशल मनुष्यबळाची ताकद अधोरेखित होते.” त्यांनी राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या ध्येयात उद्योगांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही नमूद केले.
१९९२ मध्ये स्थापन झालेला हा प्लांट आज टाटा मोटर्सच्या प्रमुख उत्पादन केंद्रांपैकी एक बनला आहे. जवळपास ६०० एकर क्षेत्रावर पसरलेल्या या केंद्रात ट्रक, बस तसेच इलेक्ट्रिक आणि फ्युएल-सेल वाहनांचे उत्पादन केले जाते. वार्षिक एक लाखाहून अधिक वाहनांची उत्पादन क्षमता असलेल्या या प्लांटमधून तयार होणारी वाहने देशांतर्गत वापरासोबत निर्यातीसाठीही पाठवली जातात.
बाबो, 1 लिटर इंधनावर 45 किमीचा मायलेज! जगातील सर्वात जास्त मायलेज देणारी Hybrid Car आली
या प्लांटमुळे ८,००० हून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला असून, विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासाला चालना मिळत आहे. विशेष म्हणजे, हा प्लांट १००% नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालतो आणि वॉटर-पॉझिटिव्ह असल्यामुळे पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लागतो.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “उत्तर प्रदेशसोबतची आमची भागीदारी औद्योगिक प्रगती आणि सामाजिक विकासाचे उत्तम उदाहरण आहे.” एकूणच, हा टप्पा टाटा मोटर्सच्या शाश्वत आणि भविष्याभिमुख गतीशीलतेच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे.






