राहुल गांधी यांचं राजकारण यापूर्वी कुणी गांभीर्यानं घेत नव्हतं; परंतु अलीकडच्या काळात ते ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या गटातील लोकांना भेटत आहेत, त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यावरून ते गांभीर्यानं राजकारण करीत आहेत, हे लक्षात येतं. ‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळी त्यांनी रस्त्यात आलेल्या काही लोकांशी चर्चा केली. तो सिलसिला पुढं चालू ठेवला आहे. त्यांनी ट्रकचालकांसोबत प्रवास केला. ट्रक चालवून पाहिला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांसोबत शेतकरी बनले. रेल्वे स्टेशनवर ते हमाल झाले. त्यांनी डोक्यावर ओझं वाहून नेलं. त्यांची ही शैली राजकारण बरंच काही सांगून जाते. यामागचा हेतू समजू शकतो. राहुल कोणत्याही रणनीतीशिवाय समाजातील या घटकांना भेटत आहेत, असं नाही. सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राजकारणाचा प्रभाव दिसून येत आहे. राहुल यांचा ‘कुली अवतार’ बरंच काही सांगून जातो. राहुल गांधी अचानक दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथं ते हमालांना भेटले. त्यांनी हमालातील एक होऊन हमालाची भूमिका वठवली. त्यांनी हमालाचे लाल कपडे घातले. त्यांचं सामान डोक्यावर घेतलं आणि काही वेळ इतर हमालांसोबत काम केलं. त्यानंतर राहुल गांधी त्या हमालांमध्ये बसले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहजादा आणि नामदार म्हणत. त्यांचा हा उल्लेख राहुल गांधी सामान्य लोकांपासून कसे वेगळे आहेत, त्यांचा सामान्यांच्या सुख-दुखाशी कसा संबंध नाही, हे सांगण्याचा होता. त्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्यांची भाजपनं बनवलेली प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न राहुल आता करीत आहेत आणि त्यात त्यांना यश येत आहे. हमालांच्या सोबतच्या बैठकीनंतर हमालांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती जास्त महत्त्वाची आहे. हमाल म्हणाले, की गरिबांमध्ये राहणाराच गरिबांच्या वेदना समजू शकतो. राहुल यांच्याबाबत असं कुणी म्हणत असेल, तर हा काँग्रेस नेत्याचा पहिला मोठा विजय आहे. २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राहुल विरुद्ध नॅरेटिव्ह निर्माण केलं होतं, की ही लढाई कामदार विरुद्ध नामदार अशी लढत आहे. म्हणजे कामदार भाजप तर राहुल नामदार म्हणजे समाजापासून नाळ तुटलेला घटक. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोदी यांनी वांरवार राहुल यांची संभावना राजपुत्र अशी केली होती. ही प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न राहुल करीत असून त्यांची प्रतिमा आता चांगली झाली आहे.
राहुल गांधी यांना यांची ‘भारत जोडो’ यात्रा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. त्यांचं नाव गांधी आहे, म्हणून त्यांना विनासायास सर्व गोष्टी मिळत गेल्या, असं नॅरेटिव्ह भाजपचे नेते तयार करीत गेले. सुरुवातीला राहुल तसं आहेत, असं लोकांना वाटत होतं.
हे नॅरेटिव्ह राहुल यांना बराच काळ चिकटलं आणि काँग्रेसचं प्रत्येक वेळी राजकीय नुकसान होत गेलं; पण राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं या नॅरेटिव्हला धक्का दिला. राहुल यांच्याबाबत ‘एसी रूममध्ये बसणारा नेता’ अशी विधानं केली गेली होती; परंतु या विधानांना ‘भारत जोडो’ यात्रेत त्यांनी केलेल्या तीन हजार किलोमीटरहून अधिक प्रवासात छेद दिला गेला. शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत, तरुणांपासून महिलांपर्यंत, ज्येष्ठांपासून दलित-आदिवासींपर्यंत सर्वांनाच राहुल भेटले. ते पंजाबच्या ट्रक चालकांना भेटले होते. अत्याधुनिक आणि व्हीआयपी वाहनाचा त्याग करत त्यांनी दिल्ली ते अंबाला प्रवास ट्रकमधून केला. त्या प्रवासात राहुल यांनी स्वत: ट्रक चालवला, बराच वेळ त्या चालकांशी बोलले. त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता या सर्व बाबी, नॅरेटिव्ह आणि राजकारणातील समज अनेक प्रसंगी जातीय समीकरणंदेखील करू शकत नाहीत, असे चमत्कार करू शकतात. २०१४ पासून भाजप आणि मोदी यांना मिळालेल्या अनपेक्षित यशाचं विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यांचं यश महत्त्वाचं असतं; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं, ते त्यांनी केलेल्या नॅरेटिव्हचं; परंतु आता मात्र भाजपच्या हातचा हा मुद्दाच राहुल यांनी काढून घेतला आहे. भाजपनं आतापर्यंत ज्या मुद्द्यांचं भांडवल केलं, तेच मुद्दे आता भाजपच्या हातून काढून घेऊन, त्याला मूलभूत मुद्यापर्यंत खेचून आणण्यात काँग्रेसला कर्नाटकात यश आलं होतं. आता राहुल अन्य ठिकाणीही भाजपला जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यास भाग पाडलं जात आहे. भाजपला जे नको होतं, तेच आता घडतं आहे. मूलभूत प्रश्नांऐवजी भावनिक मुद्याचं राजकारण करण्यात भाजपचं हीत होतं. राहुल गांधी आता केवळ रॅली किंवा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत नाहीत, तर ते त्यांच्या बाजूनं ते मैदानात उतरत आहेत. लोकांना ते भेटत आहेत. राहुल राजकारणाच्या शेवटच्या रेषेत पोहोचले आहेत. ते ज्या लोकांना भेटतात, ते लोक कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे असू शकतात. ते ओबीसी, अत्यंत मागासलेले, शहरी किंवा ग्रामीण असू शकतात; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व लोक ‘सामान्य लोक’ आहेत. हा देशाचा वर्ग आहे, जो रोज कष्ट करून पैसे कमवतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
महात्मा गांधी यांनी तळागाळातील लोकांचं अंतिम हीत हे राजकारणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं सांगितलं होतं. या घटकांचा विचार, त्यांचा फायदा, त्यांचं हीत राजकारण्यांनी पाहिलं पाहिजे. राजकारणात जेव्हा शेवटच्या ओळीपर्यंत सर्वांना फायद्याचा विषय येतो, तेव्हा ती शेवटची ओळ सामान्य जनता असते. राहुल यांनी त्यांच्या काही सभांमधून आता सामान्यांचा आपण कसा आवाज आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल सर्वसामान्यांच्या कसे हिताचे आहेत, त्यांना त्यांच्या समस्या कशा समजतात, त्यांना पुढं येऊन त्यांचं म्हणणं कसं ऐकायचं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते नुसतं आपलंच म्हणणं मांडत नाहीत, तर इतरांचं ऐकतात, हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मोदी इतरांचं न ऐकता स्वतःचं म्हणणं फक्त सांगत असतात, त्याला हा छेद आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेससाठी हे नॅरेटिव्ह उपयुक्त ठरू शकतं. राहुल गांधी यांची २०१४ पासून निर्माण झालेली प्रतिमा मोडीत निघायला वेळ लागेल; पण त्या दिशेनं राहुल यांची पावलं वेगानं पडत आहेत. भाजपच्या हिंदुत्व-राष्ट्रवादाचा जोरदार प्रतिवाद करत आहे. भाजप राष्ट्रवादापासून हिंदुत्वापर्यंतच्या खेळपट्ट्यांवर जोरदार फलंदाजी करत असताना, काँग्रेसला स्वत:ची राजकीय खेळपट्टी तयार करावी लागणार आहे. सामान्य माणसाची ही खेळपट्टी देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी योग्य ठरू शकते. कारण ही व्होटबँक कोणत्याही जाती-धर्मावर आधारित नाही. जो त्यांच्या हक्काबद्दल बोलेल, त्यालाच मतदान करणारा हा घटक आहे. त्यांना ना राष्ट्रवादाच्या प्रश्नांची फारशी पर्वा आहे ना मंदिर-मशीद वादात ते अडकतात. अशा परिस्थितीत भाजपच्या नॅरेटिव्हमध्ये न अडकता या सामान्य माणसाला आपल्या गोटात घेतलं, तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. राहुल यांना मोदी-केजरीवाल यांचं आव्हान असेल. आता राहुल यांनी नक्कीच योग्य दिशेनं पावलं टाकली आहेत; पण त्यांचा मार्गही तितका सोपा होणार नाही. त्याचं कारण म्हणजे या खात्यातही त्यांना मोदी यांच्याशी राजकीय स्पर्धा करावी लागणार आहे. खरं तर, राहुल सध्या ज्या रणनीतीचा अवलंब करत आहेत, त्या रणनीतीच्या मदतीनं मोदी यांनी आपला राजकीय प्रवास घडवला आहे. जनतेशी त्यांचा थेट संबंध हेच त्यांचं बलस्थान होतं. त्यामुळं त्यांनी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि दोनदा देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलं आहे. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाचं नाव ‘आम आदमी पक्ष’ असं ठेवलं आहे. त्यांच्या पक्षाचा राजकीय पायाही या सामान्य माणसाच्या पाठिंब्यावरच बांधला गेला आहे. अशा स्थितीत राहुल यांना हा प्रवास करायला नक्कीच उशीर झाला आहे; पण आता त्यांनी अशाच पद्धतीनं सर्वसामान्यांना बरोबर घेतलं आहे. भाजपनं निर्माण केलेल्या त्यांच्या सर्व समजांना छेद दिला, तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ‘इंडिया’विरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडीत रंजक लढत पाहायला मिळणार आहे.
– भागा वरखडे






