फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यातून त्यांचा शैक्षणिक, वैचारिक आणि बौद्धिक विकास घडतो, असा विश्वास पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तक पेटी भेट’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच निऑन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते विविध शाळांना वाचनीय पुस्तकांच्या पेट्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार सचिन भालेराव, पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर, सचिव अमोल पाटकर, खजिनदार राहुल ठाकूर, निऑन फाउंडेशनच्या संध्या पाटील, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा रोडखड, दाभोण (पिलेना पाडा), टेम्भीखोडावे, घाटीम, कर्दळ, आर्यन, अभिनव विद्यालय विराधन बुद्रुक तसेच आंभाण मनोर येथील जिल्हा परिषद व संस्थेच्या शाळांना पुस्तकांच्या पेट्या वितरित करण्यात आल्या. या पुस्तकांमध्ये बालसाहित्य, कथासंग्रह, सामान्य ज्ञान, विज्ञानविषयक तसेच प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता वाचनाच्या माध्यमातून त्यांचे ज्ञानविश्व अधिक व्यापक व्हावे, या उद्देशाने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचनसामग्री मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुस्तक पेट्यांचे वितरण करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. “ही पुस्तके केवळ कपाटात बंद करून न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्तपणे वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत. नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो,” असे त्या म्हणाल्या.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.






