तब्बल १ कोटी ९० लाखांना गंडा !
छत्रपती संभाजीनगर : जमीन खरेदी-विक्री व प्लॉटिंग व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून बनावट करारनामा, खोट्या कागदपत्राआधारे एका आडत व्यापारी मित्राला मित्रासह त्याच्या कुटुंबीयांनी तब्बल १ कोटी ९० लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २४ मे २०२४ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान दिल्लीगेट परिसरात घडला.
गौसिया बेगम शेख शफीक, शेख इरफान अजहर शेख शफीक, शेख शफीक शेख हबीब (तिघे रा. सलमान हॉलजवळ, दिल्लीगेट) आणि शेख जमील शेख रसूल (रा. हिमायतनगर) अशी फसणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात फिर्यादी शेख ईमान शेख अहमद शरीफ (३७, रा. भारतनगर, सिल्लोड) हे एपीएमसी कॉम्प्लेक्समध्ये एस. आय. ट्रेडर्स या नावाने आडत व्यापार करतात. त्यांचे मित्र शेख इरफान अजहर शेख करत शफीक हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने गुंतवणूक केली.
हेदेखील वाचा : IIT Mumbai News: धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन; हॉस्टेलच्या ९ व्या मजल्यावरून मारली उडी, नेमकं कारण काय?
हिमायतनगर येथील गट नंबर १९/१ मधील १९ गुंठे जागा खरेदी करून त्यावर प्लॉटिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यातून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. मग नंतर कारण पुढे करून जमीन खरेदीसाठी पैसे कमी पडत तक्रारदाराकडून मे २०२४ मध्ये दोन वेळा बँक खात्यातून २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेण्यात आले. त्यानंतर प्लॉट क्रमांक ९० व ९१ (एकूण ३८३० चौ. फूट) तक्रारदारासाठी राखीव ठेवण्यात येत असल्याचे सांगून एकूण २ कोटी रुपयांचा सौदा ठरवण्यात आला. त्यापैकी १ कोटी ४५ लाख ८६ हजार रुपये रोखीने, तर उर्वरित रक्कम नोंदणीकृत खरेदीखतावेळी देण्याचे ठरले.
करारनामा झाला, पण नोंदणी झालीच नाही
ऑगस्ट २०२४ मध्ये करारनामा करून देण्यात आला. मात्र, संबंधित जमीन शेख इरफान यांच्याकडे काम करणाऱ्या वॉचमन शेख जमील शेख गुलाम रसूल यांच्या नावावर असल्याचे दाखवण्यात आले. करारनाम्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर विविध कारणे सांगून कधी कागदपत्रांसाठी, कधी तांत्रिक अडचणींच्या नावाखाली फोनपे, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे अधिक रक्कम घेतली गेली.
७/१२ नसलेली जमीन, संशय वाढला
एप्रिल २०२५ मध्ये नोंदणीकृत खरेदीखत करण्याची मागणी केल्यानंतर ७/१२ उताऱ्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले. मात्र, परिसरातील नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर इमान यांच्या लक्षात आले की, संबंधित व्यक्तींनी अनेकांकडून पैसे घेऊनही कोणालाही नोंदणी करून दिलेली नाही.
जोगवाडा जमिनीचे दिले केवळ आश्वासन
दरम्यान, जोगवाडा येथील १६ एकर २९ गुंठे जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, तलाठी कार्यालयात चौकशी केली असता, या जमिनीचाही ७/१२ संबंधितांच्या नावावर नसल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, तर हीच जमीन यापूर्वी इतर व्यक्तींना मुखत्यारपत्र देऊन व विक्री केल्याचे समोर आले. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






