बुलढाण्यातील 'या' भागातून दोन चिमुकल्यांचे अपहरण, एकाची हत्या तर दुसरा अजूनही बेपत्ता, नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य-ट्विटर)
बुलढाण्यातून चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाची हत्या करून त्याला उकीरड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. तर दुसरा 14 वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी १० वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते. यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलीसांना संशय आला. पोलिसांनी शेख अन्सार ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला उकीरड्यात पुरले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकीरड्यातून बाहेर काढला.
आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र यामुळे आंबाशी गाव व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा मंगळवारपासून (23 जुलै) बेपत्ता झाला आहे. कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतरही बराच काळ घरी परतला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. गावात, शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा सापडला नाही.
आज २४ जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही. तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर देखरेख ठेवून, काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. अजूनही बेपता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे.