कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी महिलांवरच टाकणे अयोग्य (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : महिला सक्षम आहेत म्हणून प्रत्येक जबाबदारी त्यांच्यावर टाकणे योग्य नाही. जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे स्त्रीच्या आकांक्षा आणि इच्छा दडपल्या जाणार नाहीत, याची कुटुंबाने खात्री करावी. परस्परांशी संवादातून कुटुंबाने आपले प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
विश्वमंगल्य सभेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भागवत हे ‘युगानुरूप मातृत्व’ या विषयावरील व्याख्यानानंतर प्रश्नांना उत्तरे देत होते. महिलांना समाजात समान आदर आणि पाठिंबा मिळेल, असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी समाजाची आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तिला जे खरोखर करायचे आहे ते करू शकते, तेव्हाच तिला शांती आणि समाधान मिळते. कुटुंबाने सलोखा टिकवून ठेवावा.
कुटुंबातील महिलेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिला कोणत्या संधी देता येतील, याचा विचार कुटुंबाने स्वतःलाच करायला हवा, असा आग्रह त्यांनी धरला. ते म्हणाले की, या विषयावर स्त्री-पुरुष दोघांमध्येही जागरूकता असणे आवश्यक आहे आणि बदलाची सुरुवात कुटुंबातूनच व्हायला हवी.
पुरुषांमध्ये जागृतीची गरज
महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांमध्ये जागरूकता निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी येथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुषांनाही या विषयावर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन करतो. स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या घरात योग्य वातावरण निर्माण करा. याशिवाय बदल शक्य होणार नाही, असेही भागवत म्हणाले. कौटुंबिक आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महिला महत्त्वाची भूमिका बजावत असत. भागीदारीची ती भावना पुन्हा जागृत करण्याची गरज सरसंघचालकांनी व्यक्त केली.






