अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, मात्र लग्नाला विरोध; आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आणि निकिता १४ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाले. बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. कुटुंबातील सदस्यांनी आणि ओळखीच्या लोकांनी आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. यानंतर, कुटुंबाने १५ ऑगस्ट रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.मात्र मिळालेल्या माहितीनुसार आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध केला म्हणून प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं
दरम्यान, गोकासावंगी शिवार येथील अप्पर मोरना तलावात मासेमारीसाठी गेले होते. त्यांना पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. मृतदेह पाहून उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तलावातून मृतदेह बाहेर काढले. त्यांची ओळख महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे अशी पटली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, महादेव आणि निकीता यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याची इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. मात्र, दोघे वेगवेगळ्या जातीतील असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दोघांनी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घरच्यांकडून लग्नाला परवानगी मिळत नसल्याने दोघे नैराश्यात गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दोघांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आणि तपासातील इतर बाबी समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाचा गंभीर मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन व्यक्तींनी आपल्या पसंतीने विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीय किंवा समाजाकडून होणारा विरोध त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम करू शकतो. मात्र, या प्रकरणात नेमके कोणते कारण निर्णायक ठरले, हे पोलिसांच्या सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






