फोटो सौजन्य - Social Media
काही नाती अशी असतात की काळ, अंतर आणि आयुष्यातील धावपळ यामुळे त्यांच्यातील संपर्क कमी होतो; मात्र भेट झाली की ती पुन्हा पूर्वीसारखीच फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा बहरली आहे झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेमुळे. मालिकेत ‘पमा परब’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांनी सहकलाकार अदिती सारंगधरसोबतच्या त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या मैत्रीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मेघना यांनी सांगितले की, त्या आणि अदिती अकरावीपासून पदवीपर्यंत एकाच बॅचमध्ये होत्या. अदिती रुईया महाविद्यालयात शिकत होती, तर मेघना रुपारेल महाविद्यालयात. त्या काळात विविध एकांकिका स्पर्धांमुळे दोघींची सातत्याने भेट होत असे. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात असूनही त्यांच्यात कधीही स्पर्धेची भावना नव्हती. उलट एकमेकींच्या कामाचे मनापासून कौतुक करण्याची सवय होती. कॉलेजचे दिवस संपल्यानंतर दोघी आपल्या-आपल्या करिअरमध्ये व्यस्त झाल्या आणि संपर्क केवळ ‘हाय-हॅलो’पुरताच मर्यादित राहिला.
‘सनई चौघडे’मुळे दोघींना पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून जुनी मैत्री नव्या उत्साहाने फुलली. मालिकेत त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे विरुद्ध स्वभावाच्या आहेत. मेघना साकारत असलेली ‘पमा’ ही व्यक्तिरेखा ‘तेजस्विनी’ला घाबरते, तर तेजस्विनीला पमाची उपस्थितीही आवडत नाही. मात्र कॅमेरा बंद झाल्यानंतरचे चित्र पूर्णपणे वेगळे असल्याचे मेघना सांगतात.
त्यांच्या मते, दोघींचे मेकअप रूम शेजारी असल्याने शूटिंगदरम्यान बराच वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळते. त्या एकत्र जेवतात, कॉफी पितात, गाणी ऐकतात, व्हिडिओ पाहतात आणि भरपूर गप्पा मारतात. अदितीला मेघनाच्या डब्यातील थोड्या गोडसर भाज्या आवडतात, तर अदितीही स्वतः काही खास पदार्थ बनवून मेघनासाठी घेऊन येते. दोघी एकत्र राजगिऱ्याचे लाडू खातात. एकमेकींना भेटवस्तू देण्याचीही त्यांची खास परंपरा आहे. मेघनाने अदितीला वॉटर सिपर भेट दिला होता, तर अदितीने घुंगरूंनी सजवलेली सुंदर डिझायनर बॅग भेट म्हणून दिली.
मैत्रीचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे अध्यात्म. मेघनाच्या मेकअप रूममध्ये असलेल्या स्वामींच्या मूर्तीला अदिती आवर्जून नमस्कार करते. अदिती रेकीचा सराव करते, तर मेघना प्राणिक हीलिंगशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अध्यात्म, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनाविषयीचे विचार यांवरही दोघींमध्ये अनेकदा चर्चा रंगते. संगीताची आवडही दोघींना समान असल्याने सेटवर वेळ मिळाला की त्या एकत्र संगीताचा आनंद घेतात.
मेघना सांगतात की, दोघींचे स्वभाव मात्र एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. अदिती अत्यंत ठाम, उत्साही, बिनधास्त आणि रॉकस्टारसारखी व्यक्तिमत्त्व असलेली आहे, तर स्वतः मेघना शांत, कमी बोलणारी आणि भावगीतासारख्या स्वभावाची आहेत. मात्र कदाचित हाच त्यांच्या मैत्रीचा सर्वात मोठा गुण आहे. वेगवेगळे स्वभाव असूनही त्या एकमेकींना समजून घेतात, साथ देतात आणि मनातील अनेक गोष्टी एकमेकींसोबत शेअर करतात.
Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
मेघना पुढे म्हणाल्या की, सेटवर अदितीचे शूटिंग नसले की तिची आठवण येते. ती सेटवर आली की संपूर्ण वातावरणच प्रसन्न आणि आनंदी होते. ‘सनई चौघडे’मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. ही मैत्री आजही तितकीच सुंदर, प्रामाणिक आणि घट्ट आहे. आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणले, याचा मला मनापासून आनंद आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘सनई चौघडे’ने प्रेक्षकांना केवळ एक नवी कथा दिली नाही, तर दोन जुन्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचे निमित्तही ठरले आहे. पडद्यावरील संघर्ष आणि पडद्यामागील जिव्हाळ्याची मैत्री यामुळे या दोघींची केमिस्ट्री प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेत आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता झी मराठीवर प्रसारित होत असून प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.






