
'आप'मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)
पत्रकार परिषदेत माहिती देताना राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यासोबत या मोहिमेत इतर चार खासदारही सामील आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंह साहनी आणि स्वाती मालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे. एकाच वेळी सात राज्यसभा खासदारांनी साथ सोडल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, आम आदमी पार्टीच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण राजकीय नाट्यावर बोलताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अण्णा हजारे म्हणाले, “लोकशाहीमध्ये कोठे जायचे आणि कोठे राहायचे, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. त्यामुळे कोणावरही सक्ती करणे अयोग्य आहे. जर त्यांना लोकशाही व्यवस्थेत काही अडचणी आल्या असतील, तर कदाचित याच कारणामुळे त्यांनी पक्ष सोडला असावा. यामागे काहीतरी मूळ कारण नक्कीच असणार. लोकशाहीमध्ये, त्यांना जिथे हवे तिथे जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. यात दोष पक्षाचा आणि संघटनेचा आहे. जर पक्षाचे कामकाज योग्य रितीने चालले असते, तर त्यांनी पक्ष सोडला नसता.”
ज्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून हा पक्ष जन्माला आला, तोच आज विखुरत आहे, या प्रश्नावर अण्णांनी मार्मिक भाष्य केले. “जेव्हा वैयक्तिक स्वार्थ वरचढ ठरतो, तेव्हा माणसे आणि संघटना तुटतात. जर देश आणि समाजहित डोळ्यांसमोर ठेवले असते, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. दुर्दैवाने, आज लोक समाज आणि देशाला विसरून केवळ सत्ता आणि पैशाच्या मागे धावत आहेत. या सत्तेच्या हव्यासामुळेच सर्व काही विस्कळीत झाले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राज्यसभेतील संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घटल्याने आणि महत्त्वाचे चेहरे भाजपच्या वाटेवर असल्याने आम आदमी पार्टी आता बॅकफूटवर आली आहे. अण्णा हजारेंच्या या वक्तव्यामुळे पक्षाच्या नैतिक अधिष्ठानावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनातील नैतिकता सोडून ‘आप’ आता केवळ सत्तेचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.