राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील (Photo Credit- ANI)
Delhi: Rajya Sabha MPs Raghav Chadha, Sandeep Pathak and Ashok Mittal meet BJP National President Nitin Nabin at the party headquarters 2/3rd MPs of AAP in the Rajya Sabha announced merging with the BJP. pic.twitter.com/cRLnmOQRFZ — ANI (@ANI) April 24, 2026
‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले, “मी पक्षाच्या कामकाजापासून स्वतःला अलिप्त का ठेवले होते, याचे खरे कारण मी आज तुमच्यासमोर उघड करत आहे. त्यांच्या गुन्ह्यांमध्ये मला सहभागी व्हायचे नव्हते. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होण्यास मी नकार दिला, म्हणूनच त्यांच्या मैत्रीसाठी मला ‘अपात्र’ मानले गेले. आमच्यासमोर केवळ दोनच पर्याय उरले होते: एकतर राजकारण सोडून द्यायचे आणि गेल्या १५-१६ वर्षांपासून आम्ही हाती घेतलेले जनकल्याणाचे काम थांबवायचे; किंवा आपली ऊर्जा आणि अनुभव सत्कारणी लावून सकारात्मक राजकारण करायचे. म्हणूनच, आम्ही म्हणजेच राज्यसभेतील ‘आप’च्या दोन-तृतीयांश सदस्यांनी भारतीय संविधानात नमूद केलेल्या तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
आप’मधील फुटीची घोषणा करताना राघव चड्ढा पत्रकार परिषदेत म्हणाले, “राज्यसभेत आम आदमी पक्षाचे १० खासदार आहेत. या मोहिमेत दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी सह्या केल्या आहेत. आम्ही राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र सादर केले आहे.” संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या चड्ढा यांनी सांगितले की, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील भाजपमध्ये सामील होत आहेत. या सात जणांव्यतिरिक्त आपण त्यांच्याही संपर्कात असल्याचे सांगून राघव चड्ढा यांनी केजरीवाल यांची चिंता वाढवण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’… राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदार फुटल्यानंतर ‘आप’ची पहिली प्रतिक्रिया समोर
आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात खासदारांपैकी तिघे असे पाऊल उचलतील अशी आधीच अपेक्षा होती. यामध्ये राघव चड्ढा आणि ‘आप’ यांच्यातील मतभेदांची बातमी सार्वजनिक झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आले, तेव्हा चड्ढा कोणत्याही क्षणी केजरीवाल यांना सोडून जातील असा अंदाज वर्तवला जात होता. हरभजन सिंग हेदेखील पक्षाच्या हालचालींवर बराच काळ गप्प राहिले होते. स्वाती मालीवाल यांच्या बंडाची संपूर्ण कहाणी सर्वांनाच माहीत आहे.
या मुद्द्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि अनुराग ढांडा यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ हा क्षुद्र राजकारणाचा खेळ असून, पंजाब सरकार करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा आणण्यासाठी रचलेला हा एक कट आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पंजाब सरकार ३०० युनिट्स मोफत वीज पुरवते, राज्यातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण देते आणि तीस वर्षांपासून कोरड्या पडलेल्या कालव्यांमध्ये पाण्याचा प्रवाह यशस्वीपणे पूर्ववत केला आहे. शिवाय, दलित आणि आदिवासी समुदायातील माता-भगिनींना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. भगवंत मान सरकार गरिबांसाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या मोफत वैद्यकीय उपचार सुविधांचीही खात्री करते. अशा सरकारला अस्थिर करण्याचे आणि त्याचा विश्वासघात करण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोप त्यांनी केला.






