इरोड: आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing Of Helicopter) करण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. इथल्या सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह (एसटीआर) (STR) भागातील एका आदिवासी पाड्याजवळ उकिनियममध्ये श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या चॉपरचं इमर्जन्सी लँडिंग(Sri Sri Ravi Shankar Helicopter Emergency landing) करण्यात आलं.
[read_also content=”चार भावांनी चुलतभावाचं अख्खं कुटुंब संपवलं, दौंडचं भिमानदीत ७ जणांचं भीषण हत्याकांड का घडलं? पोलिसांनी सांगितलं खरं कारण; सख्या चार भावांना व बहिणीला ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/murder-of-those-seven-out-of-anger-over-childs-death-rural-police-shackled-sakyas-four-brothers-and-sister-364426.html”]
कदम्बुर पोलिसांनी माहिती दिली की, रविशंकर आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलेले अन्य तिघे जण सुरक्षित आहेत. काही वेळ हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग करुन थांबवण्यात आलं होतं. मात्र पुढे मग 50 मिनिटांनी हवामान नीट झाल्यानंतर हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्यात आलं. कोणालाही काहीही त्रास झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर हे आपल्या खाजगी हेलिकॉप्टरने बँगलोरवरून तिरुपूरला जात होते. यावेळी रविशंकर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे दोन सहाय्यक आणि वैमानिक इतकेच जण होते. कदम्बुरचे पोलीस निरीक्षक सी वडिवेल कुमार म्हणाले की, ‘जेव्हा हेलिकॉप्टर सकाळी 10.15 वाजता निघालं तेव्हा अचानक हवामान खराब असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे वैमानिक पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे उकिनियममध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. काही वेळासाठी हे लँडिंग करण्यात आलं होतं.
माजी सीपीआय आमदार पी एल सुंदरम यांच्या सांगण्यावरून उकिनियम गावात पोहोचलेल्या तामिळनाडू पझांगुडी मक्कल संगमचे राज्याचे कोषाध्यक्ष के रामासामी यांनी सांगितलं की आम्ही तिथे पोहोचेपर्यंत हेलिकॉप्टरला पुढे जाण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर गावामध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ थांबलं होतं. त्यानंतर 11.30ला ते तिरुपूरसाठी रवाना झालं. वेळीच या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याने धोका टळला, अशी भावना या घटनेवर व्यक्त केली जात आहे. जर खराब हवामानातही वैमानिक हेलिकॉप्टर चालवत राहिला असता तर भयानक परिस्थिती ओढवू शकली असती. मात्र तसे न झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.






