पृथ्वीराज चव्हाण आणि दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (फोटो- फेसबुक/सोशल मिडिया)
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काल (दि.26) रात्री 9.51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. जगभरातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आदरांजली वाहिली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कॉँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे अत्यंत जवळून काम केले होते. डॉ मनमोहन सिंह हे अत्यंत उच्चशिक्षित होते तसेच तें अर्थतज्ज्ञ होते. पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. तें राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते परंतु तें राजकारणी नव्हते असं म्हटले जाते. कारण तें परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती हे मी अगदी जवळून पाहिले आहे.”
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “2008 च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहन सिंह यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची देशाला झळ बसू दिली नाही.त्यांनी अनेक महत्वाचे कायदे केले मनरेगा सारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा,शिक्षणाचा हक्काचा कायदा (Right to Education), वनधिकार कायदा असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. मनमोहन सिंह यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळ मधील तो 10 वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.”
दिवंगत नेते मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच महत्त्वपूर्ण मागणी देखील केली आहे. संजय सिंह म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, ते भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नचे पात्र आहेत. भारताच्या प्रगतीसाठी 10 वर्षे काम करणाऱ्या महान अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधानांचे निधन ही निश्चितच दुःखद बातमी आणि मोठे नुकसान आहे. पक्षाच्या वतीने मी शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो.” अशा शब्दांत आप नेते संजय सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आप नेते संजय सिंह यांनी मनमोहन सिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.