
प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात (Photo Credit- X)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज संपूर्ण देश महिला शक्तीचा सन्मान करत असताना, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला आहे. राष्ट्रपती मुर्मू या संथाल समुदायाच्या एका मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालला गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या स्वागताऐवजी टीएमसीने या महत्त्वपूर्ण आयोजनावर बहिष्कार टाकून आपली संकुचित वृत्ती दाखवून दिली आहे.”
🚨 PM Modi slams TMC for boycotting President Droupadi Murmu’s Bengal event:
“Insult to tribal daughter, Constitution & democracy!”
TMC’s ego-driven mismanagement shames women, tribals & nation. Bengal won’t forgive—power arrogance ends soon! 🔥 pic.twitter.com/0Lcm9Pqmwi — The Alternate Media (@AlternateMediaX) March 8, 2026
राष्ट्रपती मुर्मू या स्वतः आदिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कार्यक्रमाकडे राज्य सरकारने केलेले दुर्लक्ष हे संविधानाच्या भावनेच्या विरोधात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. “टीएमसीने हा कार्यक्रम केवळ कुप्रबंधनाच्या भरवशावर सोडला. हे वर्तन लोकशाहीच्या महान परंपरेला काळिमा फासणारे आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
ममता सरकारवर निशाणा साधताना मोदींनी सत्तेच्या अहंकारावरून इशारा दिला. “शक्ती कितीही मोठी असली तरी अहंकार शेवटी विनाशाला कारणीभूत ठरतो. एका आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या गरिमेचा अपमान करणाऱ्या टीएमसीच्या गलिच्छ राजकारणाचा आणि सत्तेच्या अहंकाराचा फुगा लवकरच फुटेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंगालची जनता, आदिवासी समाज आणि देशातील महिला या अपमानासाठी टीएमसीला कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दार्जिलिंग जिल्ह्यातील ९ व्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनासाठी मुख्य अतिथी म्हणून गेल्या होत्या. मूळ कार्यक्रम फाशीदेवा ब्लॉक येथील बिधाननगरमध्ये प्रस्तावित होता, जिथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव येणार होते. मात्र, राज्य प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत हा कार्यक्रम बागडोगरा विमानतळाजवळील गोशाईपूर येथे हलवला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर राष्ट्रपतींनी स्वतः या बदलावर नाराजी व्यक्त केली. जागा लहान असल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना तिथे पोहोचता आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या, ना त्यांचा कोणताही मंत्री उपस्थित होता. राष्ट्रपतींनी ममता बॅनर्जी यांचा ‘लहान बहीण’ असा उल्लेख करत, “प्रोटोकॉल पाळणे हे पदाच्या गरिमेसाठी आवश्यक आहे, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का?” असा प्रश्न विचारल्याने या वादाला तोंड फुटले.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने लावलेले सर्व आरोप ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावले आहेत. या कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे. मात्र, केंद्र आणि राज्यांमधील हा प्रोटोकॉल वाद आता राष्ट्रीय स्तरावर तापला असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल