सासरच्या लोकांमुळे नवरा - बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा 'या' टिप्स, भांडण होतील कमी
‘तुझी आई असंच का बोलली, काय गरज होती, तुझी बहीण तर काही करतच नाही’, लग्नानंतर नवरा बायकोमधील हा संवाद प्रत्येक घरी ऐकायला येतो. सासरच्या व्यक्तींमुळे नवरा आणि बायकोमध्ये भांडण होणं हे अगदी सामान्य आहे आणि बऱ्याच घरांमध्ये हे घडतंही. तर काही घरांमध्ये हा वाद इतका विकोपाला जातो की, सासूमुळे घटस्फोट घेतल्याच्या घटनाही आपल्याकडे घडलेल्या आहेत. पण सासरच्या व्यक्तींमुळे हे वाद घडू नयेत यासाठी नक्की काय करायचं आणि नातं कसं जपायचं आपण आज जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सर्वात पहिल्यांदा समस्या नेमकी कोणती आहे ते ओळखणं गरजेचे आहे. म्हणजे काय तर वाद सासरच्या लोकांमुळे होतोय की, तुमच्या दोघांच्या स्वभावामुळे वा अपुऱ्या संवादामुळे ते आधी ओळखा. समस्येचं मूळ कारण काय आहे, नेमका वाद कोणत्या विषयांवर होतोय, निर्णय घेताना कोणाचा हस्तक्षेप होतोय यावर आधी चर्चा करा. तरच यातून काहीतरी योग्य मार्ग निष्पन्न होईल.
मी तुझ्याच बाजूने आहे ही खात्री जोडीदाराला देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवरा किंवा बायकोला ‘सतत तुझ्याच घरच्यांची बाजू घेत आहेस ’ असं वाटत असेल तर दोघांमधील दुरावा वाढतो आणि वादही विकोपाला जातात. पण ‘मला तुझं म्हणणं आणि मन समजतंय आणि आपण दोघं मिळून यावर तोडगा काढू’ असं जर नवरा म्हणत असेल तर हे वाद टाळायला मदत मिळेल आणि कठीण प्रसंगात तुम्ही त्यांच्याबरोबर आहात हा आधार त्यांना मिळतो.
दोघांनीही आदराने मर्यादा ठरवा. आर्थिक निर्णय, घरातील जबाबदारी, वैयक्तिक गोष्टी, मुलांची जबाबदारी हे सर्व एकत्र ठरवावे आणि त्यात कोणालाही तिसऱ्या व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नये. ठामपणे तुम्ही सासरच्या व्यक्तींच्या लक्षात आणून द्या. पण त्यात अनादर नसावा हे नक्की.
तसंच कोणाहीसमोर आपल्या जोडीदाराचा अपमान करू नका. रागाच्या भरात सासरच्यांंना वाईट बोलू नका. तुझ्या घरचे असेच आहेत, तुमच्या वागण्यामुळेच सर्व बिघडतं अशी वाक्य भांडणाला कारणीभूत ठरतात. तसंच तुमचा लहानसा वाद हा घरच्यांपर्यंत अजिबात पोहचवू नका. आधी एकांतात चर्चा करा आणि सोडविण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास कौन्सिलरची मदत घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या संसारात मी विरूद्ध तू नाही तर आपण दोघं विरूद्ध समस्या हेच समीकरण असावं. सासरच्यांमुळे मतभेद झाले तरी जोडीदाराला मात्र शत्रू होऊ देऊ नका तरच नातं टिकायला मदत होईल.






