सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरी केल्या आरोप केला आहे. त्यानंतर देशभरात खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली आहे.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.
निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणूकीत vvpat वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पहाता vvpat वापरावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर त्यांनी आयोगाकडून कशा पद्धतीने मतचोरी होत आहे, याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोग विरूद्ध राहुल गांधी असा संघर्षच निर्माण झाला आहे.