यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार?
गेल्या वर्षीही सरपंच संजय मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास विरोध दर्शविला होता. मंदिर व यात्रेचे पावित्र्य राखले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी ही भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेला गावातील काही घटकांचा पाठिंबा मिळाला, तर काहींनी तीव्र विरोधही दर्शविला. त्या वेळी काही राजकीय नेत्यांनी मढी येथे भेट देत मरकड यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते.
यावर्षीही सरपंच मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मढी यात्रेत व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, मध्यंतरी मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळात बदल झाला आहे. यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना परवानगी द्यायची की नाही, याबाबत नव्या विश्वस्त मंडळाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे महसूल प्रशासन व देवस्थान समिती यावर काय निर्णय घेणार, याकडे भाविक आणि व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
सरपंच संजय मरकड यांनी सांगितले की, यात्रेत दुकाने लावण्याचा अधिकार ग्रामपंचायतीचा असून देवस्थान समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये. यात्रेत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांच्या दुकानांतील कर्मचाऱ्यांचे आधारकार्ड तपासले जाईल. तसेच मढी गावातील नवीन मुस्लिम व्यावसायिकांनाही दुकाने लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी सांगितले की, यात्रेचे पावित्र्य राखले जावे, यासाठी विश्वस्त आग्रही आहेत. मात्र कोणाला व्यवसाय करू द्यायचा हा निर्णय ग्रामपंचायत आणि देवस्थान या दोन स्वतंत्र संस्थांशी संबंधित आहे. यापुढे प्रशासन आणि संबंधित संस्था काय निर्णय घेतात, यावरून यात्रेतील वातावरण ठरणार आहे.






