सणासुदीत गोडतेल आणखी महागणार
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सण जवळ आला असताना किराणा मालासह खाद्यतेल व डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. महागाईचा हा दर 15 टक्के वाढला आहे. नवरात्रीनंतर दिवाळीची लगबग सुरू होते. या सणासाठी फराळाला अधिक महत्व असते. त्याअनुषंगाने शेंगदाणे, चणाडाळ, पोहे, मुरमुरे, भडंग पोहे, डाळवे याला जास्त मागणी असते. तसेच गोड फराळासाठी आवश्यक रवा व साखरही महागली आहे.
खाद्यतेल, खोबरे, साबुदाना, बेसनाच्या दरातही 10 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सणासुदीत महागाईने बजेट कोलमडले आहे. आयातशुल्कात १२.५ वरून ३२.५ टक्के वाढ झाल्याने दिवाळीही महागली आहे. आधीच परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यात ५ ते १० रुपये वाढ झाली आहे.
भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने हे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वांगी, टोमॅटो, बटाट्याचे दर आधीच गगणाला भिडले आहेत. याशिवाय फळांच्या दरातही वाढ झाली आहे. धान्याचे दरही ‘जैसे थे’च आहेत.
महागाईने महिलांना नाकीनऊ
परतीच्या पावसाचा शेतीमालास मोठा फटका बसला आहे. दिवाळीचा फराळ करण्यासाठी एकीकडे महिलांची लगबग सुरू असताना दुसरीकडे महागाईने तोंड पोळले आहे. धान्य व फळांचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. सणासुदीमुळे किराणा मालाचे दर कमी व जास्त होतात. महागलेल्या दरात कमी होण्याची शक्यता नाही. दिवाळीत डाळींना जास्त मागणी राहते. मागणीनुसार त चढउतार होतात.
दरात कमी होण्याची शक्यता
रोजच्या जेवनातील आवश्यक घटक तूरडाळ १६०, मूगडाळ १२५, हरभरा डाळ ९५, मसूर डाळ १०० रुपये तर उडीद डाळ १३० रुपये किलो आहे. रवा ४५, मैदा ४०, साबुदाना ६५, शेंगदाना १२०, गूळ ५५ रुपये तर शेंगदाना तेलाने १९५ रुपये अशी उचल खालली आहे.






