...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना राज्य शासनाने सुरु केली. शासनाने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरीकडे मात्र अंगणवाडीसेविकांच्या प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शासनाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना अनुदान देऊन ‘रक्षाबंधन गिफ्ट’ दिले खरे; परंतु अंगणवाडी ताईंचे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या मतचोरीवरून देशासह राज्यात धुरळा उडालेला असल्यामुळे राज्यकर्त्यांना ताईंच्या प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष द्यायला मिळतो की नाही? हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे बहिणींचे अनुदान तर दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरून सबमिट केले, त्या अंगणवाडी ‘ताईंना’ ही रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे.
दरम्यान, योजना सुरू होऊन वर्ष उलटले. परंतु त्यांच्या पदरी अजूनही प्रोत्साहन भत्ता पडायला तयार नाही. परिणामी, या ताईंची अवस्था संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभार्थ्यांसारखी होते की काय? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रोत्साहन भत्त्यातील एक रुपयाही अद्याप नाही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थ्यांना वर्षभरापासून वेळेत अनुदान मिळत असताना या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंनाही अद्याप छदाम मिळाला नाही. यासंदर्भात आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार निवेदने दिली. परंतु काही एक फायदा झाला नाही, असे अंगणवाडी सेविका माया म्हस्के यांनी सांगितले.
प्रोत्साहन भत्ता केव्हा मिळणार ?
योजना सुरू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सेविकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने कबुल केले होते. परंतु वर्ष उलटूनही सेविकांना कामाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे सेविकाही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
अंगणवाडी सेविकांचे शासन दरबारी खेटे
अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या निकषांत ज्या बहिणी पात्र आहेत. अशानांच आता हे अनुदान मिळणार आहे. नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे.