सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (दि.26) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. मनमोहन सिंग हे 92 वर्षांचे होते. देशाचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून काम केलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यातील नेत्यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. थोरात यांनी लिहिले आहे की, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत. सन 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना प्रथमताच अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली. याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखविली. आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा वाटा आहे. असं थोरात म्हणाले.
पुढे थोरात यांनी लिहिले की, पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. सामान्य माणसांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांचा आवाज बुलंद केला. सन 2008 मध्ये राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला. याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार, लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे, अन्नसुरक्षा कायदा यासारखे धाडसी निर्णय त्यांनी केले. राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली, तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल. एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राज्य प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यामध्ये त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल. माजी पंतप्रधानांच्या शेवटच्या दौऱ्यात सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही शेवटच्या प्रवासात सहभागी होतात. यादरम्यान ते पारंपरिक पदयात्रा काढतात.