Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?
Raigad Zilla Parishad: रायगड परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चाना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा ‘पॅटर्न राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
Panvel News: पनवेलची तहान भागवण्यासाठी शिलार-पोशीर धरणांना हिरवा कंदील
यावेळी तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या शंकांवरही भाष्य केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हा प्रकार देशाला हादरवणारा आहे. सत्य जनतेसमोर यावे. आवश्यक असल्यास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांची मदत घ्यावी. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.
रायगड जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना शिंदे गट सत्तेबाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलेले दिसून येत आहे. राष्ट्रवादी-भाजप-ठाकरे गटाची संभाव्य आघाडी वास्तवात उतरल्यास
जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, “कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्यांना मोठे यश मिळाले. त्यामुळे हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही वापरण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही दिवसांत रायगडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र तटकरे यांनी हा विषय पक्षाच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मतदारसंघातील अर्थसंकल्प, विकासकामे, संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवरच चर्चा होणार असल्याचे सांगितले.






