फोटो सौजन्य - Social Media
कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणात सुमारे २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सुमारास स्थानिकांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराचा पंचनामा सुरू केला. धरणातील पाणी खोल आणि गाळयुक्त असल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण जात होते. त्यामुळे खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने पाण्यात उतरून काही मीटर खोलवरून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे असल्याचे समोर आले आहे; मात्र तिची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. तसेच आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सदर धरणातील पाणी कोणत्याही वापरासाठी घेतले जात नसल्याने ते कायम भरलेले असते आणि मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. यापूर्वीही या धरणात दरवर्षी दोन ते तीन मृतदेह आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणतीही कुंपण व्यवस्था किंवा इशारा फलक नसल्याचीही चर्चा आहे.
तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पाय घसरून अपघाती मृत्यू झाला असावा, अशी एक शक्यता आहे. तर दुसरीकडे घातपात करून मृतदेह पाण्यात टाकण्यात आला असावा, असा संशयही नाकारता येत नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (AD) क्रमांक ०९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणीची ओळख पटवणे, तिचा मागील काही दिवसांचा हालचालींचा तपास करणे आणि कोणत्याही संशयास्पद बाबींची छाननी करणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून धरण परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी होत आहे.






