संग्रहित फोटो
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथे पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावरुन आता काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडला आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, किरण ताजणे यांना मोठी दुखापत झाली आहे. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे.
राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून, सरकारने तातडीने हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था व पत्रकारांवर वाढते हल्ले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
हे सुद्धा वाचा ; 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या RSS ने आता गांधी विचार स्विकारावा; काँग्रेसचे आवाहन