संग्रहित फोटो
मतदानानंतर जिल्ह्यात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून, “आपलाच उमेदवार विजयी” असा दावा करत अनेक ठिकाणी समर्थकांनी चक्क पैजाही लावल्याचे चित्र दिसत आहे. भाजप समर्थकांकडून जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे, तर राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत गड राखण्यासाठी चुरशीची लढत दिल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, आज मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी साताऱ्याच्या राजकारणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकणार की राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला कायम राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होणार की परंपरागत सत्ता कायम राहणार, याचा फैसला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
भाजपच्या आक्रमक वाटचालीला अडथळा आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांसह शिवसेना आणि काँग्रेसनेही आपआपल्या परीने शर्थीचे प्रयत्न केले. प्रत्येक जागेवर चुरस वाढली असून, अंतिम निकालात राजकीय गणिते कशी जुळतात याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त
शनिवारी झालेल्या मतदानानंतर रविवारी दिवसभर जिल्ह्यातील राजकीय मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आकडेमोडीत गुंतले होते. फोनाफोनीद्वारे विजय–पराभवाचे अंदाज बांधले जात असून, संभाव्य सत्तासमीकरणांवर चर्चा रंगत आहेत.
12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींची मतमोजणी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. निकालानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु झाली आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे कल समोर येणार आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.






