सौजन्य - नवराष्ट्र टीम
मेढा/दत्तात्रय पवार : बहुप्रतीक्षेनंतर लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शनिवारी झालेल्या मतदानामध्ये जावळीतील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणांसाठी एकूण ६२ टक्के मतदान शांततेत पार पडले. या मतदानाचा आज सोमवारी फैसला होणार आहे. कुसुंबी व म्हसवे जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत झाली त्यामुळे या दोन गटातील व त्या अंतर्गत येणाऱ्या चार गणातील निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुसुंबी, म्हसवे कुडाळ जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत सहा गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कुडाळ गट भाजपच्या दृष्टीने सुरक्षित ठरला. या ठिकाणी राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार न दिल्याने भाजपला येथील लढत सोपी झाली. भाजपचे कुडाळ गणाचे उमेदवार सौरभबाबा शिंदे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची चिन्हे आहेत. मात्र म्हसवे गटात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लक्ष घातल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना असा चुरशीचा दुरंगी सामना येथे पाहायला मिळाला.
म्हसवे गटात क्रॉस वोटिंगचा फटका देखील भाजप पक्षाला बसू शकतो असे राजकीय चित्र आहे. यामध्ये म्हसवे गणातील भाजप उमेदवार रेश्मा पोफळे व राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे यांच्यात दुरंगी सामना झाला. तर खर्शी-बारामुरे गणात भाजपचे गोरख महाडिक विरुद्ध राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांच्यात देखील चुरशीची लढत होऊन नेमके कोणाच्या पारड्यात मतदारांनी मतदान टाकले हे आज ठरणार आहे. मात्र या ठिकाणी अधिकच लीड न घेता उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता आहे. तर म्हसवे जिल्हा परिषद गटासाठी भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे विरुद्ध शिवसेनेचे संदीप पवार यांच्यात लढत झाली आहे.
कुसुंबी जिल्हा परिषद गट हा भाजपचे रांजणे यांना सुरुवातीपासून सुरक्षित राहील अशी परिस्थिती होती मात्र या ठिकाणी देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाने ताकद लावल्याने या ठिकाणी देखील चुरशीचा सामना झाला. जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून अर्चना रांजणे विरुद्ध सेनेच्या कविता ओंबळे यांच्यात लढत झाली तर पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणात भाजपचे विजय सपकाळ विरुद्ध शिवसेनेचे आतिश कदम यांच्यात अटीतटीची लढत झालेली पहायला मिळत आहे.
कुसुंबी गणात सेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम यांचे गाव येत असल्याने या गणातून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ठिकाणी शिवसेनच्या सुनीता दुंदळे विरुद्ध भाजपच्या पुष्पा चिकणे यांच्यात चुरशीची लढत झालेली पाहायला मिळाली आहे. या दोन्ही गणात क्रॉस वोटिंग झाल्याने या गणातील निकालाकडे देखील तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री प्रदेशाध्यक्षांनी सभा गाजल्या
जावळी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हाय प्रोफाईल राजकीय मंडळींच्या सभा तालुक्यात झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुसुंबी गटाच्या उमेदवार कविता ओंबळेंसाठी केळघर येथे सभा घेतली. बांधकाम मंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारादरम्यान संपूर्ण तालुका पिंजून काढला होता. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील म्हसवे गटात आपले संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी-सेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उतरवल्याने तालुक्यातील ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावर गेली होती. त्यामुळे आज लागणाऱ्या निकालाकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेचा कुसुंबी गटावर काय परिणाम होतो? प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरवूनही म्हसवे गटात नेमके काय चित्र निकालाचे राहते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
तिन्ही पक्षांकडून पैश्यांचा बेसुमार वापर
जावळी तालुक्यातील निवडणूकांचे निकाल हे अलीकडच्या काळात आर्थिक गणितांवर अवलंबून रहात आहेत. हे ओळखून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी येथील निवडणुकांत पैश्यांचा वापर बेसुमार केला आहे. त्यामुळे निश्चित निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.






