राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती नाही
अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान
रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता
पुणे: राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती मिळालेली नसतानाच अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १८) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा बुधवारी (ता. १७) कायम होती. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारी किंवा संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवण्याबरोबरच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
पुणे शहर, जिल्ह्याचा घाटमाथा परिसर तसेच नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहून संध्याकाळनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम
दरम्यान, पुणे शहरात बुधवारी (ता. १७) दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. शहराचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी (ता.१८) तापमानात फारसा बदल अपेक्षित नसून कमाल तापमान ३६ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारी अथवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनची प्रतीक्षा कायम
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात. १६ ते १८ जूनदरम्यान वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच १८ व १९ जून रोजी धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांना पावसाची अद्याप प्रतीक्षाच; कमी पावसामुळे चिंतेचे ढग कायम
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी वातावरण अंशतः ढगाळ होऊ शकते. मंगळवारी (ता.१६) शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी (ता.१७) तापमानात आणखी किंचित वाढ होऊन कमाल तापमान ३७ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.






