
मान्सूनच्या प्रगतीसाठी अखेर अनुकूल परिस्थिती
नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा पुढे सरकण्याची शक्यता
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
पुणे: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून ठप्प झालेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी अखेर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, २३ जूनपासून नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २४ आणि २५ जून रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
यंदा केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेला मान्सून ६ जूनला तळकोकणात पोहोचला. त्यानंतर ८ जूनला दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत त्याने मजल मारली. मात्र, पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरणीय स्थिती अनुकूल नसल्याने मान्सूनची उत्तर सीमा एकाच ठिकाणी स्थिर राहिली. परिणामी राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. काही शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्याही निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही भागांत २३ जूनच्या आसपास मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील अधिक भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…
पुण्यात पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नाही. अधून मधून ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाही. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (ता.२०) ३५ अंश सेल्सिअस इतके किमान तर २३.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले.तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. रविवारी (ता. २१) शहरात किमान तापमान स्थिर तर कमाल मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर २४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती मिळालेली नसतानाच अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १८) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा बुधवारी (ता. १७) कायम होती. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारी किंवा संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवण्याबरोबरच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.