
मोसमी वाऱ्यांची गती मंदावली
मोठ्या पावसासाठी पुढील आठवड्याची प्रतीक्षा
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किंचित मंदावला
पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किंचित मंदावल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांची आगेकूच तळकोकणात स्थिरावली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची स्थिती पुढील आठवड्यानंतर निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रविवारी मोसमी वाऱ्यांनी ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकत मिझोराम, मणिपूर, नागालँड तसेच त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांपर्यंत प्रगती केली. महाराष्ट्रात मात्र मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत अद्याप बदल झालेला नाही. सध्या मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील सीमा देवगडमधून जात आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वारे राज्यातील इतर भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याच्या अंतर्गत भागांत तुरळक ठिकाणी, तर किनारी भागांत अनेक ठिकाणी पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. ८ ते १० जूनदरम्यान किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ८) कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिले आणि दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण दिसून आले. दरम्यान, विदर्भ, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील दोन दिवस रात्रीचे किमान तापमान २६ ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मंगळवारी (ता. ९) कमाल तापमान स्थिर राहण्याची तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…
केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री
केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झाला असून यावर्षी तो नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिरा दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी सध्या परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांत तो दक्षिण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. विदर्भात मान्सून १५ जूननंतरच दाखल होण्याची शक्यता आहे.