
मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला!
अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान असलेल्या अर्जुन यांची सध्या जम्मू-काश्मीरमधील ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटमध्ये नियुक्ती होती. मंगळवारी उशिरा उरी सेक्टरमधील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ नियमित गस्तीदरम्यान अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अर्जुन जाधव यांच्यासह आणखी एका जवानाला वीरमरण आले.
स्फोटानंतर सहकाऱ्यांनी तत्काळ जखमी जवानांना श्रीनगर येथील बदामीबागमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र उपचार सुरू असतानाच अर्जुन यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेत वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी असल्याचे समजते.
कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना
दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, तो भूसुरुंगाचा होता की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास लष्कराकडून सुरू आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे. अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. १२) शहापूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
अर्जुन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे धाकटे बंधू ऋषी जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत असून सध्या सुटीवर गावी आले आहेत. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
२५ जून रोजी अर्जुन जाधव यांचा मुलगा सर्वेश याचा पहिला वाढदिवस साजरा होणार होता. त्या आनंदसोहळ्यासाठी अर्जुन यांनी १५ जूनपासून सुटी घेऊन गावी येण्याचे नियोजन केले होते. कुटुंबीयांनीही वाढदिवसाची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यापूर्वीच उरीतील स्फोटात त्यांना वीरमरण आल्याने वाढदिवसाच्या उत्सवाचे स्वप्न कायमचे अपुरे राहिले. या घटनेमुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.