कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी
गजानन गिरी, मसूर : रेल्वे प्रशासनाने मसूरसह कोणेगाव – कवठे- कांबिरवाडी- वडोली भिकेश्वर या गावा अंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी मसूर रेल्वे स्टेशन नजीकच दोन्ही बाजूला कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. भुयारी मार्गाचे संपूर्ण काम झाले आहे. मात्र केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा मार्ग रखडवत ठेवला आहे. या भुयारी मार्गाला उद्घाटनाचा मुहूर्त केव्हा मिळणार ॽ असा प्रश्न पडला आहे. सद्यस्थितीत जीवावर तांगटी तलवार ठेवली आहे. किंबहुना जीव मुठीत धरून प्रवाशांना या मार्गावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.
सदर भुयारी मार्गाचे काम दोन्ही बाजूने चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. हा भुयारी मार्ग केवळ उद्घाटनाच्या निमित्ताने रखडवत ठेवला आहे. या भुयारी मार्गातून मसूरसह – कोणेगाव – कवठे – कांबिरवाडी – वडोली भिकेश्वर – या गावातील ग्रामस्थांना धोका न पत्करता या मार्गस्थ होता येणार आहे. कवठे, कोणेगाव या गावातील ग्रामस्थांना मल्हारपेठ – पंढरपूर मार्गावरून मसूरला जाण्या – येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून याचा वापर करता येणार आहे. सद्यस्थितीत कवठे व कोणेगावच्या ग्रामस्थांना रेल्वेचा उड्डाणपुल संपल्यानंतर उजवीकडे वळसा घालत धोकादायक स्थितीत पाठीमागून, समोरून, खालील असे तिन्ही बाजूकडून वाहन येते का ? या भितीत प्रवास करावा लागत आहे.
Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल
मल्हारपेठ – पंढरपूर या राजमार्गावरील मसूर – उंब्रज रस्त्यावर उड्डाणपूल अल्पकाळात बांधला गेला. रेल्वेगेट बंदचा त्रास पूर्णता संपला. या मार्गावरील वाहतूक विना अडथळा सुरू झाली. परंतु भुयारीमार्ग केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने रकडवत ठेवला आहे. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यास दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. गरजेचे असताना रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली आहे. केवळ औपचारिक उद्घाटनासाठी प्रवासांच्या जीवावर तांगटी तलवार ठेवत रेल्वे प्रशासन भुयारी मार्ग सुरू करण्याबाबत दिरंगाईसह कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. आठ दिवसात रेल्वे प्रशासनाने तात्काळ भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा. अन्यथा मसूरसह कवठे, कोणेगाव, कांबिरवाडी, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आला आहे.
रेल्वे उड्डाणपूल संपल्यानंतर उजवीकडे धोकादायक स्थितीत वळताना अनेक अपघात घडले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कित्येकजण जायबंदी झाले आहेत. या स्थितीत रेल्वेने भुयारी मार्ग केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रकडवला आहे. रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्ग उदघाटनाची निर्णयक्षमता इतकी कमी असू शकते. हे आश्चर्याकारक मानले जात आहे.






