Mla Sunil Tingre Narrated The Sequence Of Events After The Allegations Of Pressurizing The Police Nrdm
पोलिसांवर दबाव आणल्याच्या आरोपानंतर आमदार टिंगरेंनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला; म्हणाले…
कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अगरवाल यांचा फोन आल्याने आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
पुणे : कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं जातंय. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा आहे. परंतु, या चर्चांवर सुनील टिंगरे यांनी मौन सोडलं असून टिंगरेंनी आपली बाजू एका पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे.
‘कल्याणीनगरमध्ये (19 मे 2024) रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो,’ असं म्हणत टिंगरेंनी मरण पावलेल्यांबद्दल निस अवधिया, अश्विनी कोस्टा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
टिंगरे यांनी पुढे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. “या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं मात्र विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे,” असं म्हणत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
टिंगरेंनी आपली बाजू मांडली
“माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता 15 मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीआय यांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी 6 वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली,” असं टिंगरे यांनी म्हटलं आहे.
“दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तूस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास आहे,” असं टिंगरे पोस्टच्या शेवटी म्हणालेत.
Web Title: Mla sunil tingre narrated the sequence of events after the allegations of pressurizing the police nrdm