मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट! अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरला वेग
mumbai atal setu pune expressway : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग या महत्त्वाच्या जोडणी प्रकल्पात ठोस प्रगती नोंदवत कामांना लक्षणीय वेग दिला आहे. संपूर्ण मार्गावर पायाभूत, उपसंरचना आणि अधोसंरचना स्तरावरील कामे समांतरपणे पुढे सरकत असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीत स्पष्ट गती दिसून येत आहे.
एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणी काम पूर्ण झाले असून १४१ ठिकाणी पियर्स उभारण्यात आले आहेत. ८८ ठिकाणी पियर कॅप्सची कामे पूर्ण झाली आहेत, तर ८३० पैकी ६५३ प्रीकास्ट गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या संरचनात्मक बांधणीला बळ मिळत असून अभियांत्रिकी अचूकता आणि कामाचा वेग या दोन्ही बाबतीत प्रभावी प्रगती साधली जात आहे. पळस्पे परिसरात स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असून, यामुळे द्रुतगती मार्गाशी सुरळीत व अखंड वाहतूक जोडणी सुनिश्चित होणार आहे.
७.३५ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकांचा (११.५ मी + ११.५ मी रुंद) हा उच्च क्षमतेचा पूल अटल सेतू (शिवडी–न्हावा शेवा) आणि मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग यांदरम्यानची महत्त्वाचा दुवा म्हणून उभा राहत आहे. चिर्ले आणि पळस्पे मार्गे थेट, उच्च-गती जोडणी उपलब्ध होणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही (NMIA) या मार्गातून सुलभ प्रवेश मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कॉरिडॉर मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांना एकाच जलद वाहतूक पट्ट्यात जोडणारा महत्त्वाचा कणा ठरेल. ‘मुंबई 3.0’च्या संकल्पनेला गती देत हा मार्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम करेल आणि प्रादेशिक आर्थिक हालचालींना नवे बळ देईल.
फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प एमएमआरडीएच्या ‘मुंबई इन मिनिट्स’ या व्यापक दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्क यांचे एकात्मिक जाळे उभारून नागरिकांना जलद, अखंड आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देण्याचा यामागील हेतू आहे.
‘मुंबई 3.0’च्या आराखड्यांतर्गत ही जोडणी नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील नव्या विकासकेंद्रांना चालना देणार आहे. शहरी विस्तार, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल. नव्या आर्थिक केंद्रांपर्यंत आणि विमानतळापर्यंत थेट व कार्यक्षम पोहोच उपलब्ध झाल्याने मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन संपूर्ण प्रदेशाच्या उत्पादकतेत वाढ होणार आहे.
डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, यांनी सांगितले की, “या जोडणीमुळे मुंबईकरांना अटल सेतूमार्गे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सिग्नलविरहित, अखंड प्रवासाची सुविधा मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत, मुंबई आणि पुणे दरम्यानचा दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल. मुंबई वा पुण्यात राहून काम किंवा शिक्षणासाठी प्रवास अधिक सोपा होईल—आणि ‘मुंबई 3.0’ घडवत असताना ‘मुंबई इन मिनिट्स’ अंतर्गत कनेक्टीविटी अधिक बळकट करणे आणि तासांवरील प्रवास मिनिटात घडवणे संकल्पनांचा हाच खरा उद्देश आहे.”






