भांडुप बसस्थानक की 'मृत्यूचा सापळा'? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म
दरवेळी अपघात झाला की चौकशी, पाहणी, आश्वासने आणि नंतर पुन्हा सगळे पूर्ववत! हीच प्रशासनाची पद्धत बनली आहे. दोन महिन्यांपूर्वीच सदर बस स्थानक परिसराची पाहणी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे लाेकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी पुरेसा अनुभव नसलेल्या चालकांकडून बस चालवली गेली आणि झालेल्या अपघातात चार लोकांचा बळी गेला. नागरिकांच्या जीवाशी प्रयोग करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? असा सवाल भांडुपकर करत आहेत.
अरुंद रस्ते, डोंगराळ भाग आणि प्रचंड वाहतूक काेंडी यामुळे मोठ्या बस वळवणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे, सहा मीटरच्या लहान बसेस चालविण्याबाबत यापूर्वी वरिष्ठ अधिकारी व लाेकप्रतिनिधींमध्ये चर्चा झाली हाेती तरीही प्रशासन आठ-नऊ मीटरच्या मोठ्या बसेसच चालवण्याचा हट्ट करत आहे असा सवाल केला जात आहे. यामागे आर्थिक गणिते आहेत का? अशी जाेदरार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. एकीकडे, स्टेशन परिसरातील पोलीस बीट, बेस्ट बीट आणि नव्याने उभारलेली महानंदाची टपरी हे सर्व मिळून रस्त्याला अडथळ्यांचे जाळे बनले आहे. नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. मग बस चालक सुरक्षितपणे वाहन कसे चालवणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. स्टेशन परिसरात रिक्षाची गर्दी होऊ नये म्हणुन वाहतूक पोलिसांनी सीमारेषा आखून दिली असतानाही रिक्षाचालक सर्रास नियम मोडून स्टेशन परिसरात घुसतात. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेणे, रेषेबाहेर उभे राहणे सगळे खुलेआम सुरू आहे. पण कारवाई मात्र शून्य! पाेलीसांच्या या नियमाबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी बस डेपो स्थलांतराची स्पष्ट मागणी केली होती. स्टेशनजवळील पार्किंग जागा किंवा ड्रीम्स मॉल परिसराचा पर्यायही सुचवला होता. मात्र प्रशासनाने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. परिणामी आज पुन्हा अपघात झाला म्हणजेच प्रशासनाच्या निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत की बस डेपो तातडीने स्थलांतरित करावा, मोठ्या बसेस बंद करून लहान बसेस सुरू कराव्यात, परिसरात असलेल्या दुकानांचे अडथळे तातडीने हटवावेत, नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. भांडुप पश्चिम बसस्थानकातील परिस्थिती ही केवळ प्रशासनाच्या अपयशाची नाही, तर पूर्णपणे निष्िक्रय आणि बेफिकीर यंत्रणेची जाहीर कबुली आहे. प्रत्येक अपघातानंतर आश्वासने देणे आणि पुन्हा दुर्लक्ष करणे हा खेळ आता नागरिक सहन करणार नाहीत. आणखी किती अपघात आणि किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा प्रश्न खा. संजय दिना पाटील यांनी केला आहे.






